गझल सादरीकरणात पार्श्वभूमी आवश्यक; सर्वसामान्यांना समजेल अशी भाषा हवी
marathinews24.com
पुणे – कमी वेळात आणि कमी शब्दात व्यक्त होण्याचे गझल हे एकमेव माध्यम आहे. गझलेची विधा मोठी आहे. गझल लिखाण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे परंतु ही विधा सर्वसामांन्यांमध्ये पोहोचलेली नाही आणि कुणाच्या लक्षातही राहात नाही, अशी खंत प्रसिद्ध गझलकार डॉ. कैलास गायकवाड यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. १५) आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राज्यस्तरीय मराठी गझल संमेलनात डॉ. कैलास गायकवाड यांचा गझलमित्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्या वेळी डॉ. गायकवाड बोलत होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, मैथिली आडकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
गझलेची गोडी लावण्यात गझलकार अपयशी – भूषण कटककर
भूषण कटककर यांनी ‘गझलेला रसिकाश्रय एक चिंतन’ या मुद्द्यावर सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, गझलकार गझल लिहितो पण त्याचा अर्थ कळत नसल्याने सर्वसामान्य व्यक्ती त्यापासून दूर असते. त्यामुळे गझलेतील शब्द कळण्याजोगे असावे. गझलेवर समीक्षात्मक भाष्य व्हायला हवे त्याचप्रमाणे समकालीन विषय गझलामंधून उमटले पाहिजेत. रसिकांना मराठी गझलेची गोडी लावण्यात आपण अपयशी ठरत आहोत कारण गझल सादर करताना त्याची पार्श्वभूमी सांगितली जात नाही.
सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकात विशद केली. डॉ. कैलास गायकवाड यांचा परिचय मुक्ता भुजबले यांनी करून दिला तर सन्मानपत्राचे वाचन अश्विनी जगताप यांनी केले. आभार मैथिली आडकर यांनी केले. वैशाली माळी, वैभव कुलकर्णी, प्राजक्ता वेदपाठक, मुक्ता वैजयंती आपटे, वासंती वैद्य यांनी संयोजन केले.























