डॉ. गौरव घोडे आणि कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक उपक्रम; ‘गनिमी कावा’च्या धर्तीवर नियोजन करून एका रात्रीत कर्नाटक गाठत सहा लाखांची मेघडंबरी उभारली
marathinews24.com
पुणे – स्वराज्यासाठी बलिदान देणारे थोरले छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्नाटकातील कणकगिरी येथील समाधीस्थळाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी धर्मवीर शिवसेना आध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. गौरव घोडे आणि कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक उपक्रम राबविला. ‘गनिमी कावा’च्या धर्तीवर नियोजन करून एका रात्रीत कर्नाटक गाठत, श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानच्या भक्तगणांच्या सहकार्याने तब्बल सहा लाख रुपये खर्चून ४०० किलो वजनाची पंचधातूची मेघडंबरी समाधीवर उभारण्यात आली.
लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली अन् जिंकली मॅरेथॉन – सविस्तर बातमी
कणकगिरी येथील थोरले संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने या पवित्र स्थळाला थडग्याचे स्वरूप आले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन समाधीचे पावित्र्य, ऐतिहासिक महत्त्व आणि स्मृतीस्थळाचे संरक्षण कायम राहावे, यासाठी डॉ. गौरव घोडे यांनी कार्यकर्त्यांसह पुढाकार घेतला.
ऊन, वारा आणि पावसापासून समाधीचे संरक्षण व्हावे तसेच या ऐतिहासिक वारशाचे पुढील पिढ्यांसाठी जतन व्हावे, या उद्देशाने कोणताही गाजावाजा न करता नियोजनबद्ध पद्धतीने हे कार्य पूर्ण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या लढ्यात वापरलेल्या ‘गनिमी कावा’च्या प्रेरणेतून प्रतिकूल परिस्थितीतही हे कार्य पूर्ण करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.
इतिहासातील नोंदीनुसार, अफजल खानाच्या कर्नाटक मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू श्री संभाजी महाराज यांचा घात झाला होता. कणकगिरी येथील त्यांच्या स्मृतीस्थळाकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने त्याची दुरवस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर डॉ. गौरव घोडे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत समाधीस्थळाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला.
कर्नाटकातील ऐतिहासिक स्मृतीस्थळांच्या संवर्धनासाठी डॉ. गौरव घोडे आणि कार्यकर्त्यांची ही दुसरी मोहीम आहे. यापूर्वी कर्नाटकातील श्री शहाजी महाराजांच्या समाधीवरही मेघडंबरी उभारण्यात आली होती. त्यानंतर कणकगिरी येथील संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळासाठी पुढाकार घेत ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, संरक्षण आणि विकास यासाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. भविष्यात या स्मृतीस्थळांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि छत्रपती घराण्याचा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी डॉ. गौरव घोडे यांनी केली.
“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजी महाराज यांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा ठेवा आहे. या ऐतिहासिक स्मृतीस्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शासनाने या स्थळांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचा विकास व संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी कळकळीची विनंती डॉ. गौरव घोडे यांनी केली.
या उपक्रमासाठी डॉ. गौरव घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर शिवसेना आध्यात्मिक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानचे गुरुदत्त शेळके,प्रदीप तिकोणे,श्रीकांत रेणके,अविनाश पवार,सुनिल ढवळे,आदर्श कांबळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भक्तगणांनी मोलाचे सहकार्य केले.





















