नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सरहदचे शिष्टमंडळ नेपाळमध्ये जाणार
marathinews24.com
पुणे – नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नेपाळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सरहद संस्थेने पुढाकार घेतला आहे.
नेपाळमधील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी तसेच आपत्तीमुळे नेमके किती आणि कोणत्या स्वरूपाचे नुकसान झाले आहे याचा अभ्यास करण्यासाठी सरहदचे एक शिष्टमंडळ लवकरच नेपाळच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये पूरग्रस्त भागांना भेट देऊन स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था, नागरिक आणि आपत्तीग्रस्तांशी संवाद साधण्यात येणार आहे.
या अभ्यासातून नेपाळमध्ये सध्या सर्वाधिक गरज कोणत्या क्षेत्रात आहे, कोणत्या स्वरूपाचे दीर्घकालीन व परिणामकारक काम करता येईल तसेच *मदतकार्याची दिशा आणि प्राधान्यक्रम निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. केवळ तात्पुरती मदत न करता स्थानिक गरजांचा अभ्यास करून शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, मूलभूत सुविधा, बालकल्याण आणि उपजीविका पुनर्स्थापना यांसारख्या क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार काम करण्याची शक्यता सरहदकडून तपासली जाणार आहे.
या संदर्भात आयोजित बैठकीस संजीव शहा, दिलीपसिंह विश्वकर्मा, डॉ. शैलेश पगारिया, विवेक राऊत, संजय नहार, चंद्रकांत घाणेकर, राजेंद्र नवले, लेशपाल जवळगे उपस्थित होते.





















