सेवा,समर्पण आणि भक्तीचा अनोखा संगम; हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ, वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होणे हेच आमचे भाग्य-रामेश्वर नाईक नाईक
marathinews24.com
पुणे – Ashadhi Wari : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमास यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पायी चालून आलेल्या वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांना आराम मिळावा, त्यांच्या प्रवासातील शारीरिक ताण कमी व्हावा आणि सेवाभावाची परंपरा अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
इथेनॉलयुक्त ई-२० पेट्रोलबाबतच्या धोरणाविरोधात ‘टीम भारत’चे देशव्यापी ‘३एस’ आंदोलन – सविस्तर बातमी
वारी मार्गावरील विसावा ठिकाणी उभारण्यात आलेल्या चरणसेवा केंद्रांमध्ये स्वयंसेवकांनी अत्यंत आत्मीयतेने वारकऱ्यांचे स्वागत करत पायांची स्वच्छता, तेल मालिश तसेच आवश्यक प्राथमिक सेवा उपलब्ध करून दिली. या सेवेमुळे अनेक वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
पुणे जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना, युवक मंडळे तसेच नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने दिवसभर वारकऱ्यांची सेवा करत ‘सेवा हीच खरी ईश्वरभक्ती’ हा संदेश कृतीतून दिला.
रामेश्वर नाईक – आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. ‘चरणसेवा’ उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाजातील सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची भावना अधिक दृढ करणारा आहे. भविष्यातही अशा सेवाभिमुख उपक्रमांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे.”
पुणे जिल्ह्यातील या उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या प्रवासात दिलासा मिळाला असून भक्ती, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे. या उपक्रमाचे वारकरी तसेच नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
























