ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
Pune – नवले पुलाजवळ अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशी ठार – भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आई-बाबांवरील रागाने तिने गाव सोडले; पण पुणे पोलिसांमुळे आयुष्य वाचले – सविस्तर बातमी
अजित गोपाळ जवंडरे (वय २४) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार अभिषेक मोरे (वय २४, रा. महापूर, जि. लातूर) जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रकचालक किशन देवीलाल नायक (वय ३०, रा. राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माेरे याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अभिषेक मोरे आणि त्याचा मित्र अजित जवंडरे हे बाह्यवळण मार्गावरुन ८ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. त्यावेळी नवले पुलाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी अभिषेक हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
पत्नीच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या
पुणे – पत्नीसह तिच्या मित्राने दिलेल्या त्रासामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीसह तिच्या मित्राविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अतुल मारुती कदम (वय ३९, रा. बालाजी काॅम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. अतुल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नी सोनाली अतुल कदम (वय ३१, रा. साडेसतरानळी, हडपसर), तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अतुल यांची आई माधुरी मारुती कदम (वय ६१) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल आणि सोनाली यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. अतुलला पत्नी साेनालीचे कृष्णा शिंदे याच्याशी मैत्री संबंध असल्याची माहिती मिळाली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादामुळे सोनाली वेगळी राहायला लागली. ती माहेरी निघून गेल्यानंतर सोनाली आणि तिचा मित्र कृष्णाने अतुलला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या मोबाइलवर संपर्क साधून धमकाविकाले. पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळे अतुलने गेल्या महिन्यात १५ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासामुळे मुलगा अतुलने आत्महत्या केल्याचे आई माधुरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे तपास करत आहेत.
वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाचा मृत्यू
कात्रज चौकातील भाजी मंडई परिसरात वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी धनंजय वणवे यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही.
धनंजय भरत वणवे (वय ४२) हे भारती विद्यापीठ वाहतूक शाखेत नियुक्तीस होते. बुधवारी (९ जुलै) सायंकाळी ते कात्रज परिसरात वाहतूक नियंत्रण करत होते. त्या वेळी वणवे अचानक बेशुद्ध पडले. त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूमागचे स्पष्ट झाले नाही. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.