पारंपारिकता टिकवत टेक्नॉसेव्हीमुळे झाले बदल
marathinews24.com
पुणे – हिंदुस्थानाच्या संस्कृतीला प्राचीन परंपरा लाभली असून, त्यापैकीच एक महत्वाची परंपरा पालखी सोहळ्याने जपली आहे. विशेषतः ८०० वर्षापेक्षा अधिक जुना इतिहास संताच्या पालखी सोहळ्याला आहे. तेव्हापासून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याला विशेष महत्व आहे. दरम्यान, मागील काही वर्षांत झालेल्या तांत्रिक बदलांमुळे आता पालखी सोहळ्याला पारंपारिकतेसह आधुनिक टेक्नॉसेव्हीचा साज चढला आहे. प्रामुख्याने संवादाचे साधन, अत्याधुनिक वाहने, रथांमधील बदल, पालखी मार्गासह प्रशासनाकडून जय्यत तयारीमुळे वारी सोहळ्याचे रूपडे देखणे दिसू लागले आहे. मात्र, आजही भजनाची, किर्तनाची परंपरा वारकरी सप्रदायाने आहे तशीच जपली आहे.
आषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान; शासन निर्णय जारी – सविस्तर बातमी
संताचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यत पोहोचावेत, धर्म, परंपरा, भक्ती, सेवेची परंपरा कायम राहावी यासाठी तब्बल ८०० वर्षांपूर्वी सुरू झालेला पालखी सोहळा आजच्या काळातही अविरतपणे सुरू आहे. बैलगाडीपासून सुरू झालेला वारकर्याचा प्रवास आता अलिशान मोटारीतून होत असून, पायी वारीत सहभागी होण्याची आस मात्र तशीच कायम आहे. शेकडो वर्षापुर्वी पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरीच्या दिशने मार्गस्थ होताना वारकर्यांना येणार्या अगणित अडचणी आज कमी झाल्या आहेत.
प्रामुख्याने वीजेचा वाणवा, इंधनाची कमतरता, भोजनाची परवड यासह अनेक संकटांचा सामना करीत हजारो वारकरी मैलाचा प्रवास करीत विठूरायाच्या भजनात तल्लीन होत होते. हळूहळू वर्ष बदलत जात असताना, पारंपारिक वारीलाही बदलांचा सुकर फायदा होउ लागला. बैलगाड्या, पावसात मिळेल त्याठिकाणी होणारा मुक्काम शाळा, धर्मशाळेत केला जाउ लागला. गावोगावचे नागरिक मोठ्या भक्ती-भावाने घरात बनविलेली शिदोरी वारकर्यांना खाउ घालत होते.
उन, वारा पावसाची तमा न बाळगता भल्या पहाटे स्नान करून काकडा आरतीने पुढच्या मुक्कामाकडे झटपटरित्या पडणारी वारकर्यांची पाउले काळानुरूप बदलत गेली. वाहनांमुळे वारकर्याचे आणि दिंडीचे साहित्य आता गाडीत ठेवण्याची सोय झाली. त्यामुळे भजन, कीर्तनात वारकर्यांची तल्लीनात अधिकच वाढत गेली. दरवर्षीचा नित्यक्रम न चुकवत वारकर्यांची सेवा वाढण्यास सुरूवात झाली. त्यामुळे गावोगावी वारकर्यांची सेवा करण्याची स्पर्धा लागली. मागील काही वर्षांत अत्याधुनिकेचा साजच पालखी सोहळ्यात असल्याचे दिसून येते.
प्रामुख्याने सोहळ्यासाठी एकत्रित येणार्या वारकर्यांप्रती सेवा, आदरभाव व्यक्त करणारे नागरिक, सेवाभावी संस्था, शासनही अग्रेसर राहत आहे. संताच्या पालखी सोहळ्यांनी पारंपारिकता टिकवत काळानुरूप आधुनिकतेचा साज अंगीकारला आहे. त्यामुळे आता सत्तरी अन ऐंशीतील वारकरी पालखी सोहळ्यात दरदिवशी मोबाइलद्वारे थेट व्हिडिओ कॉलवरून कुटूंबियासोबत ख्यालीखुशाली विचारत आहे.
श्री क्षेत्र आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांसह श्री क्षेत्र देहू- आळंदी देवाची- पंढरपूर अशी आषाढी वारी सुरू झाली. हाती ध्वज, पताका, टाळ-मृदंग निनादात भजन गात दिंडींची परंपरा सुरू झाली आहे. कालानुरूप याचे स्वरूप बदलले असून लाखो वारकरी सहभागातून पायी वारी करण्यास प्राधान्य देत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचून विठ्ठलाचे दर्शन घेणे याच दृढ निश्चयाने वारकरी दिंडी सामील होतो. जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू गाावतून निघतो.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी देवाचीहून मार्गस्थ होतो. पालखी सोहळ्याला तब्बल ८०० वर्षांहून परंपरा असून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीपुढे मानाचे दोन अश्व, मानाच्या दिड्यानंतर ३०० ते ३२० दिंड्या सहभागी होतात. त्याचप्रमाणे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्याही पालखी सोहळा शेकडो दिंड्यांसह माउलींच्या सोहळ्याप्रमाणेच आधुनिकतेचा साज आहे.
भारूड, गवळण भजनातून समाजप्रबोधन
पालखी सोहळ्यातील बहुतांश दिंड्या परंपरागत असून त्यांना क्रमांक दिलेला आहे. प्रत्येक दिंडीतील वीणाधारक वारकरी प्रमुख असून त्यांच्या आदेशानुसार अभंग, भजन गायले जातात. वारी मुक्कामाच्या भारूड, गवळण भजनातून समाजप्रबोधनही केले जाते. पहाटे दोन वाजल्यापासून तयारी करुन लवकर उठून, स्नान, देवपूजा, झाल्यानंतर वारकर्यांची श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने पडणारी पाउले पाहण्याजोगी असतात. प्रामुख्याने दिंडीचा मुक्काम रस्त्यातील गावात केला जात असल्यामुळे संबंधित गावकर्यांनाही वारकर्यांची सेवा करण्याची संधी मिळते. वारकर्यांची सोय करणे म्हणजेच विठ्ठलाची सेवा असल्याची भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे वारीतील गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव दिसूनही येत नाही. कोणताही दुजाभाव न करता वारकर्यांची विठूरायाला भेटण्याची आस कायम त्यांना प्रेरणा देते.
स्वयंशिस्त, भजन, प्रवचनाचे महत्व
संत ज्ञानेश्वर महाराजांसह जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वर्षांनुवर्षे वारकर्यांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. प्रत्येक दिंडीत वारकर्यांच्या सेवेसाठी सकाळचा नाश्ता, दुपारी आणि संध्याकाळचे जेवण देण्याची विशेष सोय केली जाते. मात्र, दिंडीत मर्यादेपेक्षा अधिक वारकर्यांची संख्या असल्यास आणि पाऊस पडल्यास वारकर्यांच्या हाल होतात. अशा स्थितीत अनेक दिंडीमालक वारकर्यांची संख्या कमी कशी राहिल याकडे लक्ष देतात. दरम्यान, दिंडी सोहळ्यात थोरवीपणापेक्षा भजनाला अधिक प्राधान्य देत गायक आणि किर्तनकार अभंग, भजन गातात. अहंकार घालाविण्यासाठी वारकर्यांना स्वयंशिस्त, भजन, प्रवचनाचे महत्व पटवून दिले जाते.