अनैतिक संबंधातून खून केल्याचे उघडकीस
marathinews24.com
पुणे – शहराजवळील रांजणगाव ( ता. शिरूर) येथे महिला व दोन मुलांच्या झालेल्या खुनाचा ग्रामीण पोलिसांनी छडा लावला असून, याप्रकरणी आरोपीला बीड परिसरातून अटक केली. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी गुन्ह्याचा छडा लावल्याची माहिती शनिवारी ( दि. ७) पत्रकार परिषदेत दिली.
पावसामुळे सोलर पंप विहिरीत पडला शेतकऱ्याचे मोठे नुकसान – सविस्तर बातमी
पुणे नगर रस्त्यावरील २५० सीसी टीव्हींचे फुटेज तपासून सुमारे १६ हजार ५०० रहिवाशांची माहिती घेऊन तपास केला. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथके पाठवून केलेल्या कसून तपासानंतर या खुनांचा छडा लावण्यात आला. रांजणगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त तपासानंतर गोरख पोपट बोखारे ( वय ३६, रा. सरदवाडी, ता. शिरूर, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदे, जि . नगर ) या आरोपीला शुक्रवारी ( दि. ६) अटक केली. तपासासाठी त्याला ११ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
स्वाती केशव सोनवणे ( वय २५, रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि . बीड ), तिची मुले स्वराज ( वय ३) व विराज ( वय १) ही या हत्याकांडाची बळी ठरली. या तिघांचे मृतदेह रांजणगावपासून खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर २५ मे २०२५ ला आढळले. अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करून तिघांचेही जाळले होते. त्यामुळे त्यांची नावे समजण्यात पोलिसांना अडचणी आल्या होत्या. प्राथमिक तपासानंतर राज्याच्या सर्व जिल्ह्यात पोलिसांची पथके पाठवून बेपत्ता व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली.
त्याचबरोबर स्वातीच्या हातावर आढळलेल्या गोंदणाच्या सहाय्यानेही तपास करण्यात आला. मात्र, त्याबाबत काहीच मागमूस लागला नाही. खून झालेल्या ठिकाणी जवळपास कोठेही सीसी टीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांपुढील आव्हान कठीण झाले होते.
बीड जिल्ह्यात गेलेल्या पोलिसांच्या पथकाला स्वाती सोनवणे नावाची महिला बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिचे वर्णन व मृत महिलेच्या वर्णनात साम्य आढळल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास जारी केला. स्वातीच्या पतीकडे चौकशी केल्यावर तिचे आपल्याशी पटत नसल्याने ती आळंदीला आईवडिलांच्या घरी गेल्याचे त्याने सांगितले. त्यांच्याकडे विचारपूस केल्यावर स्वाती बहिणीचा दीर असलेल्या गोरख बोखारे याच्यासोबत २३ मे २०२५ ला मोटार सायकलवरून गेल्यानंतर बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली.
त्यानंतर, पोलिसांनी सरदवाडीमधून गोरखच्या मुसक्या आवळल्या. तो एका खासगी कंपनीत मोटारचालक म्हणून काम करतो. त्याने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसून तपास केल्यावर स्वाती व तिच्या मुलांचे खून आपणच केल्याची कबुली त्याने दिली.
स्वाती व तिच्या पतीची नेहमी भांडणे होत होती. त्यामध्ये नातलग नात्याने गोरख मध्यस्थी करत होता. त्यातून स्वातीचे त्याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. स्वातीने त्याच्या मागे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे गोरख चिडल्याने त्याने तिला घरी नेण्याच्या बहाण्याने २३ मे २०२५ ला मोटार सायकलवरून नेले. वाटेत पेट्रोलपंपावरून त्याने बाटलीत पेट्रोल घेतले. त्यानंतर, रस्त्यात त्याने स्वाती व तिच्या मुलांचा गळा आवाळून खून केला. त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घातले. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याने पेट्रोल टाकून त्यांचे मृतदेह जाळले. मात्र, त्याचवेळी पाऊस पडल्याने हे मृतदेह अर्धवट जळाले. आरोपी गोरखने यापूर्वी काही गुन्हे केले आहेत, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.