केतन अग्रवाल हत्या प्रकरण
marathinews24.com
पुणे – ट्रेकींगच्या बहाण्याने लोहगडावर गेलेल्या तरूणीने होणार्या नवर्याला बॉयफ्रेंडच्या साथीने कठड्यावरून ढकलून देत त्याचा खून केल्याची घटना १८ जूनला घडली आहे. याप्रकरणी आता नवनवीन खुलासे होत असून, खुनापुर्वी दोघांनीही पुण्यातील कॅफेत कॉफी पित असताना तरूणाच्या खूनाचा कट रचल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. १७ जूनला कोंढवा परिसरातील थर्ड वेव्ह कॅफेमध्ये बसल्यानंतर दोघांनी हत्येचा कट रचला.
केतन विशाल अगरवाल (वय २५ रा. लोढा बेलमोंडो टॉवर गहुंजे, ता. मावळ) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सिया प्रविण गोयल (वय २० रा. लिलाकुंज, ७८ / २१ न्यु एरा सोसायटी गंगाधाम समोर कोंढवा रोड, बिबवेवाडी) चेतन बाबुलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनगर, बी ४/३०१ कोंढवा बु ता. हवेली) यांना अटक केली आहे.
देशभरात पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड चर्चेत असून, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी तरूणीने होणार्या नवर्याचा गडावरून ढकलून देउन खून केला. याप्रकरणी पोलीस तपासात नवनवीन खुलासे होत असून, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी १७ जूनला कॅफेत केतनच्या हत्येचा प्लॅन, कोडवर्ड, लोहगडाची रेकीची चर्चा केली होती. ट्रेकदरम्यान कोणी काय करायचे, याचाही समन्वय साधण्यात आला. त्यानंतर १८ जूनला आरोपींनी प्लॅनप्रमाणे केतनला कठड्यावरून ढकलून दिले. तत्पुर्वी सियाने प्लॅनप्रमाणे बॉयफ्रेंडला स्वतः खाली बसल्याचा इशारा करताच केतनला धक्का देण्यास सांगितले होते. त्यानुसार सियाने चक्कर आल्याचा बहाणा करीत खाली बसली असता, जवळच असलेल्या चेतनने केतनला धक्का मारून ढकलून दिले.
दोघांचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
दोघेही आरोपी कॅफेमध्ये जाताना, बसून चर्चा करताना आणि कॅफेतून बाहेर पडतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आरोपी कॅफेमध्ये आणखी कोणाला भेटले, नेमकी काय चर्चा झाली याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे, इतर माहितीची बारकाईने तपास केला जात आहे.
१४ जूनला केला होता पहिला प्रयत्न
‘केतनच्या खून प्रकरणातील आरोपी सिया चौधरी, तिचा प्रियकर चेतनने यापुर्वी १४ जूनला केतनला लोहगडावरुन ढकलून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. मात्र, त्यांना काही कारणास्तव प्लॅन बदलावा लागला. दरम्यान आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, हे प्रकरण संवेदनशील असून, यामध्ये अनेकांची चौकशी सुरू आहे. प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करताना भान राखणे गरजेचे आहे. तर्क वितर्कावर आधारित वृत्त प्रसारित करणे चुकीचे असल्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्पष्ट केले आहे.




















