पु. ल. स्मृती महोत्सवात पंडिता शमा भाटे यांना ‘पु. ल. स्मृती सन्मान’
marathinews24.com
पुणे – कलेच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणारे पुलं काका, मामांसारखे जवळचे वाटतात. त्यांच्या सारखा निखळ, निरोगी, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळाच. पुलंनी आपल्या विनोदाचा स्तर कधीही खाली येऊ दिला नाही आणि तरीही सर्वांना पोट भरभरून हसविले. अशी प्रतिभा, असे प्रसंगावधान, कल्पक बुद्धिमत्ता एकाच व्यक्तिमत्वात फार क्वचितच आढळते. पुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच – शमा भाटेअशा चौमुखी कलाकाराच्या नावाने सन्मान मिळाला हे माझे भाग्य आहे, अशा भावना ज्येष्ठ नृत्यगुरू पंडिता शमा भाटे यांनी व्यक्त केल्या.
‘आशय सांस्कृतिक’च्या वतीने व ‘पु. ल. परिवारा’च्या सहयोगाने अव्याहतपणे आयोजित करण्यात येत असलेल्या यंदाच्या पु. ल. स्मृती महोत्सवात दुसऱ्या दिवशी (दि. २५) पंडिता शमा भाटे यांना ‘पु. ल. स्मृती सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या. एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. कोहिनूर ग्रुपचे चेअरमन, कोहिनूर कट्टाचे प्रमुख कृष्णकुमार गोयल, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतिश जकातदार, डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी मंचावर होते. मानपत्र, शाल, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. महोत्सव प्रभात रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (NFDC-NFAI) सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या पुरस्काराच्या माध्यमातून पुलंसारख्या दिग्गज व्यक्तीचा आशीर्वाद, पाठबळ आणि कौतुकाची थाप मिळाल्याची भावना मनात आहे. अशा विभूतीच्या नावे मिळालेला आशीर्वाद म्हणजे कायम कार्यरत राहण्याची मोठी जबाबदारी वाटते, असे नमूद करून शमा भाटे पुढे म्हणाल्या, त्यांच्या निखळ विनोद निर्मितीच्या मागे एक अत्यंत प्रखर, बुद्धिमान आणि संवेदनशील कलाकार लपलेला होता. पुलंची फुलराणी ही एक स्वतंत्र कलाकृती आहे हे जाणवते. हे नाटक रुपांतर माध्यमासाठी आदर्श वस्तुपाठच ठरला आहे. पुलं हे विनोदाच्या माध्यमातून खदखदून हसविणारे व्यक्तिमत्व होते. त्याच वेळी कवी मनाचे हळवेपणही जपणारे होते.
धीरज सिंह म्हणाले, कलेची सुरुवात अनुभूतीतून होते आणि कोणत्या अनुभूतीचे रुपांतर कलेत होईल याची शाश्वती नसते. कलेचा प्रवास व्यक्तीगत आयुष्यापासून वैश्विक पातळीपर्यंत सुरू राहतो. जेव्हा नृत्यकला आपली संपूर्ण आभा प्राप्त करून घेते तेव्हा ती दैवी क्षण बनते. अनेक सांस्कृतिक शहरे पाहिलेली असताना पुण्यासारखे सांस्कृतिक वातावरण प्रत्येक शहराकडे असावे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, पुण्याची सांस्कृतिक ओळख खूप मोठी आहे. पुणे हे कलाकारांची खाण आहे. या भूमीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार निर्माण झाले आहेत. यातीलच शभा भाटे हे नाव महत्त्वाचे आहे. त्या अनेक दशके नृत्यगुरू म्हणून कार्यरत असून त्यांनी शेकडो शिष्य घडविले आहेत. त्या गुणवत्तेचा ध्यास घेतलेल्या महान कलाकार आहेत.
उत्तरार्धात विदुषी शमा भाटे यांचा नृत्यमय प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला. या विषयी बोलताना त्या म्हणाल्या, कथक नृत्याने मला सर्वस्व दिले. जगण्याचा उद्देश, सुंदरता, स्वत्वाची ओळख आणि विचार करण्याची पात्रता देखील दिली. जे काम करतो ते प्रामाणिकपणे करण्याची शिकवण दिली. कथकच्या माध्यमातून मला जणू आनंदझराच प्राप्त झाला. आपण नृत्याकडे कसे वळलो हे सांगताना त्या म्हणाल्या, पालकांचा पाठींबा असल्याने मला रोहिणीताईंकडे नृत्य शिकण्याची संधी लाभली. परदेशी कलाकारांबरोबर काम करताना परदेशी वाद्यांशी नाते जोडले गेल्यामुळे सादरीकरणातून आनंद मिळू लागला व नृत्यबंध जोडले गेले. मराठी माणसे संकोची असल्याने कलेच्या क्षेत्रातही ती मागे पडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नृत्यासाठी जाणकार प्रेक्षक निर्माण होणे आवश्यक आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, या करिता विद्यार्थी दशेपासूनच नृत्य विषयक संस्कार होणे गरजेचे आहे. अभिवाचक व संवादक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
मुलाखतीच्या सुरुवातीस विदुषी शमा भाटे यांच्या पन्नास वर्षांच्या नृत्यमय कारकीर्दीचा वेध घेणारा ‘साकव’ हा लघुपट दाखविण्यात आला. महोत्सवाची सांगता पुलंच्या एकसष्ठीनिमित्त, फिल्म्स डिव्हिजननिर्मित ‘पु. ल. व्यक्ती आणि वल्ली’ हा लघुपटाने झाली.




















