श्रीनाथ भिमाले, प्राची दुधाणे यांना छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कार प्रदान
marathinews24.com
पुणे – निकोप लोकशाहीसाठी सर्वपक्षीय मंडळींची पक्षातीत सामाजिक कृती महत्त्वाची आहे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या महापुरुषांचा वैचारिक वारसा कृतीरूपात आणण्याची गरज आहे. सामाजिक समतेच्या पृष्ठभूमीवर, हा विचारवारसा कृतीरूपात पुढे न्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी येथे केले. फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे छत्रपती शाहूजी महाराज पुरस्काराने महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सामाजिक कार्यकर्त्या प्राची दुधाणे यांचा गौरव करण्यात आला.
पुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच- शमा भाटे – सविस्तर बातमी
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पुरस्कार वितरण डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर अध्यक्षपदी होते. उपमहापौर परशुराम वाडेकर, रमाई महोत्सवाचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, काँग्रेस पक्षाचे अरविंद शिंदे, माजी आमदार दिप्ती चवधरी, डॉ. सतीश देसाई, लता राजगुरू, शैलजा मोळक, ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या काळाच्या पुढे जात समतेच्या विचारांचा, बहुजनांच्या उद्धाराचा जो वैचारिक वारसा निर्माण केला, त्यानुरूप कृती करणे, हेच त्यांच्या वारसा जतनाचे उदाहरण ठरेल. आजचे दोन्ही पुरस्कारप्राप्त मान्यवर हा वारसा मानणारे व जपणारे आहेत. शाहूजींच्या सुधारणांचा वारसा आणि वसा ते जपत आहेत, हे महत्त्वाचे आहे. पक्षातीत विचार आणि कृती, याचे उदाहरण ते घालून देत आहेत. आपण महापुरुषांना जातीपातीत अडकवले आहे. प्रत्यक्षात महापुरुषांना बंदिस्त करताच येणार नाही कारण ते संपूर्ण मानवतेचे असतात.
श्रीनाथ भिमाले म्हणाले, कामाची सदैव प्रेरणा देणारा हा पुरस्कार आहे. स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून शहराच्या, नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणारा लोकप्रतिनिधी, हीच भूमिका मनात असते. रमाई स्मारकासाठी एक कोटीच्या निधीची तरतूद या भूमिकेतूनच केली. यापुढेही पद असो वा नसो, मी विचारमंचाशी जोडला गेलो आहे आणि सदैव जोडलेला राहीन. तर प्राची दुधाणे म्हणाल्या, सामाजिक समतेचा वारसा देणार्या पणजोबा आणि पणजी, यांना हा पुरस्कार समर्पित करते. समाजासाठी काहीतरी करत राहण्याचा विचार मला बुजुर्गांनी दिला. माझ्या कुवतीनुसार मी त्याचे पालन करत आहे. मार्ग संघर्षाचा असला तरी हा प्रवास सुरू राहील.
परशुराम वाडेकर म्हणाले, रमाई स्मारकासोबतच संविधान उद्यान उभारण्याचा संकल्प केला आहे. आपल्या कार्याचा मार्ग बाबासाहेबांनी आखून दिला आहे. त्या मार्गावर वाटचाल करण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे. शाहू छत्रपतींची सामाजिक सुधारणांची दृष्टी, समविचारी सोबत घेऊन एक कार्यकर्ता म्हणून समाजासाठी कार्यरत राहणार आहे. तर सचिन ईटकर यांनी विचारमंचातर्फे सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांचा व त्यातील सातत्याचा उल्लेख केला. शाहू छत्रपतींनी १९०२ मध्ये युरोप दौरा केला. तेथील प्रकल्प, प्रगती यांचे टप्पे पाहिले. त्यातील काय घेता येईल, याचा विचार केला.
ॲड. प्रमोद आडकर यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. विचारमंचातर्फे सातत्याने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. डॉ. आंबेडकर, शाहू छत्रपती, फुले यांच्या विचारांचा जागर सर्वत्र पोहोचावा, हाच उद्देश असल्याचे ते म्हणाले. मुख्य निमंत्रक विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन, पाहुण्यांचा परिचय करून देत पुरस्कारामागील भूमिका सांगितली. लता राजगुरू यांनी आभार मानले.




















