मध्यभागातील रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात शालेय साहित्य, तसेच संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी झाल्याने शनिवारी दिवसभर मध्यभागात कोंडी झाली होती. मध्यभागातील बहुतांश रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ सोमवारपासून (१६ जून) होत आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा – सविस्तर बातमी
शालेय साहित्य खरेदीसाठी शनिवारी सकाळपासून आप्पा बळवंत चौकातील दुकानांमध्ये गर्दी झाली होती. खरेदीसाठी शहर, तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने पालक मुलांसोबत आले होते. आप्पा बळवंत चौक ते छत्रपती शिवाजी रस्त्यावरील हुतात्मा चौक (बुधवार चौक) भागात गर्दी झाली होती, तसेच संकष्टी चतुर्थी असल्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी झाली होती. शालेय साहित्य खरेदी आणि चतुर्थी असल्याने वाहतूक पोलिसांनी या भागतील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. आप्पा बळवंत चौकाकडून हुतात्मा चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवला होता.
या भागातील वाहतूक बाजीराव रस्तामार्गे वळविण्यात आली होती. छत्रपती शिवाजी रस्ता भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पावसामुळे अनेक जण मोटारीतून मध्यभागात आले होते. मोटारींमुळे मध्य भागातील वाहतुकीत कोंडीत भर पडली. बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेतील अरुंद रस्त्यावर अनेकांनी दुचाकी लावल्या होत्या. दुचाकी लावून अनेकजण आप्पा बळवंत चौकात खरेदीसाठी आले होते.
मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने लक्ष्मी रस्ता, गणेश रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्यभागतील अरुंद रस्त्यांवरून चालणेदेखील अवघड झाले होते. पावसाची शक्यता असल्याने अनेकजण सहकुटुंब खरेदी आणि दर्शनासाठी मोटारी घेऊन आले होते. मध्यभागातील वाहतूक कोंडी विचारात घेऊन अनेकांनी नदीपात्रातील रस्ता, तसेच महापालिका भवन परिसरात मोटारी लावल्या होत्या.
वाहतूक शाखेकडून नियोजन
शालेय साहित्य खरेदी, तसेच संकष्टी चतुर्थी असल्याने मोठ्या संख्येने नागरिक मध्यभागात आले होते. सकाळपासून या भागात गर्दी वाढली होती. वाहतूक नियोजनासाठी मध्यभागातील प्रमुख चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. मोठ्या संख्येेने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक नियोजन करताना पोलिसांची दमछाक झाली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून आप्पा बळवंत चौकाकडून छत्रपती शिवाजी रस्त्याकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला, असे विश्रामबाग वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांनी सांगितले.