आळंदीत माऊलींचे अश्वांचे हरिनाम गजरात आगमन
marathinews24.com
आळंदी – माऊलींचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून सुमारे ११ दिवसांचा प्रवास करीत अलंकापुरीत हरिनाम गजरात बुधवारी ( दि.१८ ) दाखल झाले. पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरा प्रमाणे अश्वांचे आळंदी देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी सरदार बिडकर वाड्यातील श्री गोपालकृष्ण मंदिरात आळंदी देवस्थानचे पदाधिकारी आणि अश्वसेवेचे मालक उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार यांचा सन्मान करण्यात आला. श्रीकरून मंदिरात दर्शनास भाविकांनी गर्दी केली.
भंडारा डोंगर पायथ्याला ‘कॉरिडॉर’ विकसित करणार – सविस्तर बातमी
श्रींचे अश्वाचें अंकली ( ता. चिकोडी, बेळगावी,कर्नाटक ) येथील राजवाड्यातून श्रींचे अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान झाले होते. अलंकापुरीतील अश्वाचें प्रथम येथील श्रीगोपाळकृष्ण मंदिर बिडकर वाड्यात आगमन झाले. येथे विसावा झाला. परंपरेने हरप्रीतसिंग बिडकर सरदार, उमेश बिडकर आणि बिडकर परिवार यांचे तर्फे पूजा व स्वागत करण्यात आले. आळंदी ग्रामस्थांचे वतीने तसेच ह. भ. प. हैबतरावबाबा आरफळकर यांच्या दिंडीने जात आळंदीकर ग्रामस्थ, दिंडी आणि आळंदी देवस्थानचे वतीने उत्साहात हरिनाम गजरात स्वागत करण्यात आले.
बिडकर वाड्यातील विश्रांती विसाव्या दरम्यान माउलीचे मंदिरात अश्व आळंदी समीप आल्याचा निरोप मिळताच श्री गुरुहैबतरावबाबा यांचे दिंडीने येत प्रथा परंपरेने अश्वांचे स्वागत पूजा झाली. यावेळी अश्व सेवेचे मानकरी उर्जितसिंह शितोळे सरदार, महादजीराजे शितोळे सरकार, आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, चोपदार रामभाऊ रंधवे, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, योगेश आरु, स्वामी सुभाष महाराज, ज्ञानेश्वर गुळुंजकर आदीसह भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.
माउली मंदिरात परंपरेने श्रींचे अश्वांचे स्वागत देवस्थान तर्फे करण्यात आले. मंदिर प्रदक्षिणा करून अश्व मुक्कामाचे ठिकाणी हरिनाम गजरात पोहोचले. आळंदी शहर काँग्रेसचे वतीने अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी स्वागत करीत नगरपरिषद चौकात अश्वांचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी दर्शनास गर्दी केली.
सनईचे वादनात, हरीनाम गजर आणि भाविकांनी अश्व दर्शनास गर्दी केली होती. अश्व माउली मंदिरात आले. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे वतीने श्रींचे अश्वांचे स्वागत करण्यात आले. आळंदी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर कारंजा मंडपात सोहळ्यासह संस्थानचे वतीने अश्व पूजा झाली. मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. अश्व पूजे नंतर अश्व येथील फुलवाले समाज धर्मशाळेत मुक्कामी पोहचले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी अंकलीकर राजवाड्यात जावून अश्व प्रस्थान सोहळा अनुभवला. यावेळी माउली गुळुंजकर, अजित मधवें आदी त्यांचे समवेत होते.
गुरुवारी ( दि. १९ ) माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान; असा होणार प्रस्थान सोहळा
पहाटे चार वाजता घंटानाद , सव्वा चार वाजता काकडा, त्यानंतर पवमान अभिषेख, पंचामृत पूजा व दुधारती, पाच वाजता भाविकांच्या श्रींचे चल पादुका महापूजा, सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत भाविकांना श्रींचे समाधी स्पर्श दर्शन, सकाळी नऊ वाजता विना मंडपात कीर्तन, दुपारी महानैवेद्य त्या नंतर भाविकांना समाधी दर्शन, परंपरेने मंदिरात धार्मिक कार्यक्रम त्या नंतर गुरुवारची पालखी सायंकाळी सहाचे सुमारास निघणार आहे. त्या नंतर मुख्य प्रस्थान सोहळा संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत होणार आहे.
गुरुवार असल्याने यावर्षीचे प्रस्थान गुरुवारची पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर सोहळ्यातील दिंड्याना मंदिर प्रवेश सुरु, श्रींचा पोशाख, प्रस्थान सोहळ्यातील कार्यक्रम सुरु होतील. या मध्ये श्रीगुरु हैबतराव बाबा यांचे तर्फे श्रींची आरती, या नंतर देवस्थान तर्फे आरती, प्रमुख मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप, विना मंडपात पालखीत श्रींचे चल पादुकांची पूजा, प्राणप्रतिष्ठापना, देवस्थान तर्फे मानकरी यांना मनाचे पागोटे वाटप, श्री गुरु हैबतराव बाबा यांचे तर्फे दिंडी प्रमुख मानकरी,पदाधिकारी यांना नारळ प्रसाद वाटप, श्रींचे समाधी जवळ संस्थान तर्फे नारळ प्रसाद वाटप, पालखीचे विना मंडपातून हरिनाम गजरात गुरुवारी रात्री उशिरा हरिनाम गजरात प्रस्थान होणार आहे.
दरम्यान श्रींचे पालखीची पुन्हा मंदिर प्रदक्षिणा व नगरप्रदक्षिणा करून श्रीं चा वैभवी पालखी सोहळा शाही लवाजम्यासह हरिनाम गजरात प्रदक्षिणा मार्गे भराव रस्ता, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर चौक मार्गे चावडी चौकातून महाद्वार पासून जुन्या गांधी वाड्यातील नवीन दर्शन बारी मंडपात आजोळघरी पहिल्या मुक्कामास विसावणार आहे. पहिला मुक्काम गांधी वाड्याचे जागेत तत्पूर्वी समाज आरती आणि रात्री हरी जागर आणि गांधी वाड्यात भाविकांना पालखीचे दर्शन होणार आहे. शुक्रवारी ( दि. २० ) श्रींचा वैभवी पालखी सोहळा पुण्यनगरीकडे हरिनाम गजरात मार्गस्थ होणार आहे.