चाकणकरांचा खुलासा; वैष्णवीच्या छळाची कोणतीही तक्रार नव्हती
marathinews24.com
पुणे – सासरच्या छळाला कंटाळून विवाहित वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती. याप्रकरणी संबंधित कुटूंबाची कोणतीही तक्रार महिला आयोगाकडे नव्हती. मात्र आम्ही घटना घडल्यानंतर सुमोटो तक्रार दाखल केली. याप्रकरणी हगवणे कुटूंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. यासंदर्भात बावधान पोलीस चांगल्या पध्दतीने काम करत आहे. त्यामुळे महिला आयोग गंभीर नाही ही टीका योग्य नसल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
सुनेच्या आत्महत्या प्रकरणात हगवणे पिता-पुत्राला पोलीस कोठडी – सविस्तर बातमी
चाकणकर म्हणाल्या, वैष्णवीच्या छळाबाबत महिला आयोगाकडं कुठलीही तक्रार आली नव्हती. मात्र आत्महत्येची घटना घडल्यावर मी स्वतः याबाबत सु-मोटो तक्रार दखल करून आरोपींना अटक केली आहे. अजून काही गुन्हे दाखल करायचे आहेत. याप्रकरणी पोलिसांशी बोलले सुरु आहे. यात अजून काही कलमं लागतील का? याबाबत अधिकाऱ्यांकडं विचारणाही केली आहे.याप्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून सगळ्यांना अटक झाली आहे. त्याचबरोबर वैष्णवीच्या बाळाला तिच्या आई-वडिलांकडं सोपवताना काय घडलं? याची मी स्वतः माहिती दिली.
नणंद भावजयीच्या एकाच दिवशी परस्पर विरोधी तक्रारी
वैष्णवीच्या मोठ्या जावेबद्दल सांगताना चाकणकर म्हणाल्या आमच्याकडं एकाच दिवशी दोन तक्रारी मेलवरुन दाखल झाल्या. यामध्ये सुरुवातीला ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मेघराज जगताप हे मयुरी जगतापचे भाऊ आहेत, त्यांनी तक्रार केली. त्यानंतर रात्री १२ वाजता मयुरीची नणंद करिश्मा हगवणे हिची ई-मेलवरुन तक्रार आली. एकाच दिवशी दोन तक्रारी आल्यानं बावधन पोलिसांकडं तक्रारी पाठवून कारवाईच्या सूचना दिल्या. एकाच कुटुंबातील वाद असल्याने आणि परस्परविरोधी तक्रारी आल्यानं हा कौटुंबिक वाद भरोसा सेलमध्ये काऊन्सिलिंग करुन सोडवला जावा यासाठी प्रयत्न केले. नियमानुसार तीन वेळा काऊन्सिलिंग करणं गरजेचं असतं. त्यानुसार यामध्ये प्रक्रिया पार पाडण्यात आली. दरम्यान आज या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल होत असल्याची माहिती यावेळी रुपाली चाकणकर यांनी दिली.
मयुरी संदर्भात राजकीय दबाव असता तर…
राजकीय दबाव असता तर सु मोटो तक्रार केली नसती. दोन्ही महिला असल्याने कौटुंबिक विषय असल्याने समुपदेशनाच्या माध्यमातून कुटूंब एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात होता. याप्रकरणी आम्ही २४ तासात एफआयआर दाखल करायला लावली. यामुळे विरोधकांचे आरोप आम्ही फेटाळून लावत आहेत.