देशात भ्रष्टाचार घटला मात्र महाराष्ट्रात वाढला
marathinews24.com
नवी दिल्ली – (रेवण कोळेकर) : देशात भ्रष्टाचार कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार व राज्य सरकार अनेक उपयोजना करत असताना भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढतच चाललेला आहे. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोने’ २०२३ मधील भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांचा अहवाल जारी केला असून यामध्ये विविध गुन्ह्यांची आकडेवारी समोर आणलेली आहे. या अहवालानुसार भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानकावर असून कर्नाटक राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे देशभरातील भ्रष्टाचार काही प्रमाणात घटला असून, महाराष्ट्रात मात्र भ्रष्टाचार वाढला आहे.
‘एनसीआरबीच्या’ अहवालानुसार २०२३ मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार देशात २०२३ मध्ये भ्रष्टाचाराची एकूण ४ हजार ६९ गुन्हे नोंदवले आहेत, तर २०२२ मध्ये देशात ४ हजार १३९ गुन्हे नोंदवले गेले होते. या तुलनेत २०२३ मध्ये महाराष्ट्रात एकूण ८१३ गुन्हे नोंदवले गेले आहेत. २०२१ आणि २०२२ मध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचारामध्ये देशात पहिल्या स्थानकावरच होता मात्र गुन्ह्याची संख्या कमी होती. २०२१ मध्ये ७७३ आणि २०२२ मधील ७४९ गुन्हे नोंदवली गेली होती असे अहवालातून सांगण्यात आले आहे. अहवालानुसार भ्रष्टाचारामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये भ्रष्टाचाराचे ३६२ गुन्हे नोंदविली गेले आहेत, तर तिसऱ्या स्थानावर राज्यस्थान ३१७ आणि तमिळनाडू मध्ये ३०२ गुन्हे नोंदवले आहेत.
या चार राज्यांमध्ये शून्य भ्रष्टाचार
देशातील छत्तीसगड, गोवा, मणिपूर, आणि त्रिपुरा या चार राज्यांमध्ये २०२३ या वर्षांमध्ये कोणतीही प्रकरणे भ्रष्टाचाराची नोंदवली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. तर नागालँड आणि सिक्कीम या दोन राज्यांमध्ये प्रत्येकी एक गुन्हा नोंदविला आहे.
७१ टक्के भ्रष्टाचारी गुन्हेगारांना रंगेहात पकडले
देशामध्ये एकूण भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यापैकी ७१ टक्के म्हणजेच २८७५ भ्रष्टाचारी गुन्हे हे सापळा रचून नोंदवली आहेत. यामध्ये संशयीतांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.
आत्महत्यांचे प्रमाणही देशात सर्वाधिक महाराष्ट्रातच
२०२३ मध्ये देशभरात तब्बल १,७१,४१८ आत्महत्या झाल्या असून ‘एनसीआरबीच्या’ अहवालानुसार कौटुंबिक समस्या आणि आजारपण ही आत्महत्येची दोन प्रमुख कारणे ठरले आहेत. या आत्महत्यापैकी सर्वाधिक २२,६८७ आत्महत्या महाराष्ट्रात नोंदविल्या गेल्या आहेत. प्रमुख पाच राज्यांमध्ये झालेल्या आत्महत्यांचा देशातील एकूण आत्महत्यामध्ये जवळपास अर्धा म्हणजे ४९ टक्के वाटा आहे.






















