खरीप हंगाम २०२५ पीक स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी राज्यात अव्वल
marathinews24.com
पुणे – राज्यात खरीप हंगाम सन २०२५ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या ११ पिकांसाठी राज्य पातळीवरील पीकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी विजेते झाले असल्याचे संजय काचोळे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.
ज्या शेतकऱ्यांची स्पर्धेत भाग घेतलेल्या पिकाची उत्पादकता तालुक्याच्या त्या पिकाच्या सरासरी उत्पादकतेच्या (त्या पिकाची मागील पाच वर्षांचे सरासरी उत्पादकता) दीडपट किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना पीक स्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येते.
सन २०२५-२६ राज्यस्तरीय पिक स्पर्धेत पिकनिहाय पुढील तालुक्यातील शेतकरी विजेते झाले आहेत.
सोयाबीन आदिवासी गट प्रथम क्रमांक भाउ तुळशिराम वारे, ओतुर ता. जुन्नर, द्वितीय क्रमांक रामचंद्र विठोबा कातवारे, आलमे ता. जुन्नर, तृतीय क्रमांकअशोक राघु नाईकरे, कमान ता. खेड. सुर्यफुल सर्वसाधारण गटात प्रथम क्रमांक नारायण बाब लोणकर, कऱ्हाटी ता. बारामती, पांडुरंग मारुती वाबळे, जळगाव कप ता. बारामती. भात आदिवासी गट प्रथम क्रमांक लक्ष्मण डोंगरु लोहकरे, मापोली ता. आंबेगाव, रामचंद्र चाहू कारोटे, दिगद ता. आंबेगाव.
बाजरी सर्वसाधारण गटात तृतीय क्रमांक रायचंद बाबुराव शिंदे, विठ्ठलवाडी ता. शिरुर.
पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील बक्षीस देण्यात येतात. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी बक्षीसाचे स्वरुप राज्य स्तरावर पहिले बक्षीस रु. ५० हजार, दुसरे बक्षीस ४० हजार व तिसरे बक्षीस रु. ३० हजार. खरीप हंगाम सन २०२५ पिक स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल आयुक्त कृषी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पीक स्पर्धा निकाल समितीद्वारे दिनांक ८ मे २०२६रोजी जाहीर करण्यात आला.























