विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचे प्रतिपादन
marathinews24.com
पुणे – रोजगार, बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांची अचूक व विश्वासार्ह माहिती शासनाच्या धोरणनिर्मितीसाठी अत्यावश्यक असून, प्रगणकांनी नागरिकांचा विश्वास संपादन करत पारदर्शक आणि अचूक माहिती संकलित करावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केले.
नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण या विषयावरील पुणे व कोकण विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी त्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत होत्या. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या वतीने ५ ते १० जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेत पुणे व कोकण विभागातील अधिकारी व प्रगणक सहभागी झाले आहेत.
विभागीय आयुक्त शितल तेली-उगले म्हणाल्या, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत देशभर राबविण्यात येणारी ही सर्वेक्षणे शासनाच्या रोजगार, कौशल्य विकास आणि आर्थिक नियोजनाशी संबंधित धोरणांसाठी महत्त्वपूर्ण आधार ठरतात. सन २०२६ मध्ये महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय तसेच आयपीएसओएस रिसर्च प्रा. लि. यांच्या सहकार्याने ही सर्वेक्षणे राबविण्यात येणार आहेत.
नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षणातून रोजगार, बेरोजगारी, कामगार सहभाग दर आणि कामगार रोजगार दर यांसारख्या महत्त्वपूर्ण निर्देशकांची माहिती उपलब्ध होते. तर असंघटित क्षेत्रातील उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणातून उद्योगांची संख्या, उत्पन्न, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्थितीचे वास्तव चित्र समोर येते. जिल्हा देशांतर्गत उत्पन्नाच्या गणनेसाठीही ही माहिती उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थींनी संगणक सहाय्यित प्रत्यक्ष मुलाखत प्रणाली, सर्वेक्षणातील संकल्पना व व्याख्या, टॅबलेटचा वापर आणि माहिती संकलन प्रक्रियेचे प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्यक्ष नागरिक व उद्योजकांकडून माहिती संकलित करताना पारदर्शकता, अचूकता आणि संयम राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तंत्रज्ञानामुळे माहिती संकलन अधिक प्रभावी झाले असले तरी नागरिकांचा विश्वास संपादन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि तिचा वापर केवळ सांख्यिकी उद्देशांसाठीच केला जाईल, याबाबत प्रगणकांनी नागरिकांना विश्वास द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
या सर्वेक्षणांमधून मिळणाऱ्या अचूक माहितीच्या आधारे रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचा विकास तसेच आर्थिक नियोजनासाठी प्रभावी धोरणे आखण्यास मदत होणार आहे. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेमध्ये अचूक सांख्यिकी माहिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पुणे विभागातील नागरिक, असंघटित क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी, सेवा क्षेत्रातील व्यावसायिक आणि सर्व संबंधित घटकांनी सर्वेक्षणासाठी भेट देणाऱ्या प्रगणकांना अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केले.
यावेळी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत अचूक माहिती, प्रामाणिक मेहनत आणि नागरिकांचा विश्वास या मूल्यांच्या बळावर सर्वेक्षण यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.























