४५ गुंतवणूकदारांची फसवणूक; व्याप्ती वाढण्याची शक्यता
maathinews24.com
पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दरमहा पाच टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ४५ गुंतवणूकदारांची १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे . या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई टाळण्यासाठी ७० हजारांची घेतली लाच – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंद राजेंद्र राजपूत (रा. बावधन, पुणे) याने ‘राजपूत वाईज इन्व्हेस्टमेंट’ या नावाने कंपनी सुरू केली होती. संबंधित कंपनी शेअर्स, स्टॉक एक्स्चेंज आणि शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे काम करत असल्याचे सांगून त्याने अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. २०२२ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपीने गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम स्वीकारली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आश्वासन देत त्याने पैसे उभे केले. मात्र, गुंतवलेली मूळ रक्कम आणि त्यावरील परतावा न देता विश्वासघात केला असे तक्रारीत नमूद आहे.
फसवणुकीत ४५ गुंतवणूकदारांची सुमारे १२ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४) तसेच महाराष्ट्र ठेवीदार (वित्तीय संस्थांमधील) हितसंरक्षण अधिनियमाच्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीने गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या निधीचा वापर नेमका कसा केला, तसेच फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.






















