तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांचे आवाहन
marathinews24.com
बारामती – बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाण्यांची उगवणक्षमता वाढते तसेच बुरशीजन्य व कीडजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते; त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी शिफारशीनुसार बियाण्यांवर बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी विभागाने केले आहे.
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक – सविस्तर बातमी
शेतकऱ्यांनी प्रमाणित व दर्जेदार बियाण्यांची निवड करून कृषी विभागाच्या शिफारशीनुसार बुरशीनाशके, कीटकनाशके तसेच जैविक घटकांचा वापर करून बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन, तूर, मूग, उडीद व इतर कडधान्य पिकांसाठी रायझोबियम व पीएसबी संवर्धकांचा वापर लाभदायक ठरतो.
बीजप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक बुरशीनाशकांची प्रक्रिया करावी. त्यानंतर आवश्यकतेनुसार जैविक संवर्धकांची प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी. यामुळे पिकांचे सुरुवातीच्या अवस्थेतील संरक्षण होऊन निरोगी व जोमदार उगवण मिळते.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन हाके यांनी केले आहे.






















