उद्याच्या सुनावणीस विशेष सरकारी अभियोक्ता व तपास अधिकाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्याची मागणी
marathinews24.com
मुंबई – कै. डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरणाच्या मागील सुनावणीस सरकारी अभियोक्ता आणि संबंधित पोलीस अधिकारी अनुपस्थित राहिल्याच्या माहितीची तातडीने चौकशी करावी. तसेच दि. ७ सप्टेंबर रोजीच्या सुनावणीस सक्षम सरकारी अभियोक्ता व तपास अधिकारी उपस्थित राहतील, याची खात्री करावी, अशी मागणी विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शाडू मातीपासून चिमुकल्यांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा – सविस्तर बातमी
कै. डॉ. गौरी पालवे-गर्जे यांचा दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी मृत्यू झाला होता. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून श्रीमती रागसुधा आर. यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
कुटुंबीयांकडून प्राप्त माहितीनुसार, विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती झालेली असतानाही दि. ६ मे २०२६ रोजी सरकारी अभियोक्ता तसेच तपास अधिकारी अथवा जबाबदार पोलीस प्रतिनिधी न्यायालयात उपस्थित नव्हते.
“केवळ विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करून शासनाची जबाबदारी पूर्ण होत नाही. प्रत्येक सुनावणीस अभियोजन आणि पोलीस यंत्रणेची प्रत्यक्ष व प्रभावी उपस्थिती आवश्यक आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
या अनुपस्थितीची सीआयडी क्राईम अथवा महिला व बालकांविरुद्ध गुन्हे प्रतिबंध विभागातील किमान पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करावी. सुनावणीची माहिती देणे, सरकारी अभियोक्त्याचे ब्रीफिंग आणि तपास यंत्रणेतील समन्वय यांची पडताळणी करून जबाबदारी निश्चित करावी. प्राथमिक चौकशी अहवाल ४८ तासांत आणि सविस्तर कृती अहवाल सात दिवसांत सादर करावा, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.




















