शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
marathinews24.com
पुणे – शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी देणारे बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (दि.११) कोथरूड पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. प्रकाशक प्रशांत आंबी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गायकवाड यांच्याकडून अश्लील शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तक्रार करूनही पुणे पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप पवार यांनी केला.
धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारण – सविस्तर बातमी
रीलस्टार संतोष पंडीत यांच्यावर तात्काळ तक्रार होऊन गुन्हा दाखल होतो तर आमदार गायकवाड यांनी ३६ शिव्यांची लाखोली वाहिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही असा प्रश्नही आमदार पवार यांनी उपस्थित केला. प्रशांत आंबी यांनी यापूर्वी कोल्हापूर पोलिसांकडे आमदार गायकवाड यांच्याविरोधात तक्रार केली आहे. गायकवाड यांनी फोनवरून आई बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आंबी यांनी केला आहे. संतोष पंडित यांच्याविरोधात ज्या पद्धतीने गुन्हा दाखल केला, त्याच धर्तीवर आमदार गायकवाड यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी आंबी यांच्या पत्नी केली.
सोनाली त्रिंबक कांबळे यांनी ५ सप्टेंबरला कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये गायकवाड आणि आंबी यांच्यातील संभाषण असल्याचा दावा केला आहे. या संभाषणात शिवीगाळ करण्यासह घरात घुसून मारहाण, जीभ कापणे आणि ठार करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत आहे. लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची भाषा वापरून धमकी दिल्याने दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
एमपीएसी पेपरफुटीची न्यायालयीन चौकशी करा’
एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही सरकारला पवार यांनी लक्ष्य केले. ऑक्टोबर २०२३ आणि जानेवारीतील पेपर फुटीच्या प्रकरणांनंतरही सरकारने ठोस कारवाई केली नाही. पेपर छपाई, प्रश्नपत्रिका तयार करणे, वितरणाच्या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. एमपीएसी अध्यक्षांच्या मालमत्तेची तसेच यापूर्वी झालेल्या चौकशी अहवालाचीही चौकशी झाली पाहिजे. पुण्यात येऊन एमपीएसी विद्यार्थ्यांशी आणि संबंधित क्लासचालकांशी सरकारने चर्चा करावी, असे आव्हानही पवार यांनी दिले.
‘पुण्यात दुसरा गुन्हा दाखल करता येणार नाही- पोलिसांची भूमिका
अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे आणि पोलिस उपायुक्त सागर कवडे यांनी या प्रकरणात पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. प्रशांत आंबी यांच्याशी संबंधित घटनेप्रकरणी यापूर्वीच कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात प्रकरण सुरू आहे. त्यामुळे त्याच घटनेचा दुसरा गुन्हा पुण्यात दाखल करता येणार नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्यायाविरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या पीडित महिला आणि प्रशांत आंबी यांची तक्रार पोलिसांकडून स्वीकारली जात नाही. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली पोलीस काम करत असून, सामान्य नागरिकांवरच दबाव आणला जात आहे. पूर्वी पोलिस ठाण्यात ‘प्रथम नागरिक’ ही संकल्पना होती. आता ‘प्रथम सत्ताधारी’ अशी संस्कृती निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्यांवर कारवाई केली जाते.
-रोहित पवार, आमदार




















