पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष, पदाधिका-यांशी साधला संवाद
marathinews24.com
पिंपरी चिंचवड – नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात ‘विकसित भारता’चा पाया रचला गेला असून, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात ‘कमळ’ रुजले पाहिजे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. आज काळेवाडी, पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार रवींद्र चव्हाण यांनी बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
जेजुरीत भीषण अपघात, ८ जण ठार, चौघे जखमी – सविस्तर बातमी
या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रदेश महासचिव आमदार विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पश्चिम महाराष्ट्र विभाग संवादक योगेश बाचल यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र विभागातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, ‘कमळ’ हे केवळ भाजपचे चिन्ह नसून, आपल्या राष्ट्रीय विचारसरणीचा अविभाज्य भाग आहे. मोदी सरकारच्या ११ वर्षांचा कार्यकाळ हा खऱ्या अर्थाने विकसित भारताच्या पायाभरणीचा काळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘संकल्प से सिद्धी तक’ या सूत्रावर आधारित गेल्या ११ वर्षांत केलेल्या अभूतपूर्व विकासकामांचा आढावा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यावर सर्वांनी भर दिला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
चव्हाण यांनी सांगितले की, आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी महाराष्ट्रात भाजपला अधिक मजबूत करता येईल आणि ‘विकसित भारता’च्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान देता येईल. ‘निर्धार भाजपा परिवार संघटनाचा, महाराष्ट्राच्या विकासाचा’ असा नाराही त्यांनी दिला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागातील भाजप परिवाराच्या सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. या प्रसंगी सर्व जिल्हाध्यक्षांशी संवाद साधत त्यांना राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.