जूनमध्ये मिळालेल्या १५० कोटींचे वितरण पूर्ण; १० ऑगस्टला मिळालेल्या ३०० कोटींपैकी ४५ कोटींचे एका दिवसात वितरण
marathinews24.com
पुणे – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्याज परताव्याच्या वितरणाला वेग आला असून, १० ऑगस्ट रोजी महामंडळाला प्राप्त झालेल्या ३०० कोटी रुपयांपैकी तब्बल ४५ कोटी रुपयांचा व्याज परतावा अवघ्या एका दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.
राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम – सविस्तर बातमी
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने महामंडळाच्या विविध योजनांसाठी ७५० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. त्यापैकी आतापर्यंत ४५० कोटी रुपये महामंडळाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये जून महिन्यात प्राप्त झालेल्या १५० कोटी रुपयांच्या निधीचे संपूर्ण वितरण करण्यात आले आहे. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी आणखी ३०० कोटी रुपयांचा निधी महामंडळाला प्राप्त झाला असून, त्यातून पात्र लाभार्थ्यांच्या व्याज परताव्याचे वितरण वेगाने सुरू करण्यात आले आहे.
निधी प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांची आवश्यक तपासणी व कार्यवाही पूर्ण करून व्याज परताव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. १० ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या ३०० कोटी रुपयांच्या निधीपैकी ४५ कोटी रुपयांचे वितरण एका दिवसात करण्यात आल्याने व्याज परतावा वितरण प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे.
महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून बँकांकडून कर्ज घेऊन स्वयंरोजगार, व्यवसाय किंवा उद्योग सुरू करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाचा परतावा महामंडळामार्फत देण्यात येतो. या व्याज परताव्यामुळे नवउद्योजकांना कर्जाच्या आर्थिक भारातून मोठा दिलासा मिळतो. तसेच व्यवसायाची आर्थिक घडी मजबूत करण्यास आणि उद्योगाचा विस्तार करण्यास मदत होते.
राज्य शासनाने यावर्षी महामंडळासाठी केलेल्या ७५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे पात्र लाभार्थ्यांना व्याज परताव्याचा लाभ देण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध झाली आहे. महामंडळाला प्राप्त होणाऱ्या निधीनुसार पात्र प्रकरणांचे वितरण प्राधान्याने करण्यात येत आहे.
प्रलंबित व्याज परतावा प्रकरणे शक्य तितक्या लवकर निकाली काढण्यासाठी महामंडळामार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा व्याज परतावा वेळेत मिळावा, यासाठी प्रकरणांची छाननी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि निधी वितरणाची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी सांगितले की, “महामंडळाला प्राप्त झालेल्या निधीतून पात्र लाभार्थ्यांच्या व्याज परताव्याचे वितरण प्राधान्याने करण्यात येत आहे. जून महिन्यात प्राप्त झालेल्या १५० कोटी रुपयांच्या निधीचे वितरण पूर्ण झाले असून, १० ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या ३०० कोटी रुपयांच्या निधीतूनही वितरणाला गती देण्यात आली आहे. यापैकी ४५ कोटी रुपयांचा व्याज परतावा एका दिवसात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित पात्र प्रकरणांमध्येही नियमानुसार कार्यवाही करून व्याज परतावा वितरित करण्यात येत आहे.”
महामंडळाच्या या उपक्रमामुळे राज्यातील पात्र लाभार्थी, स्वयंरोजगार करणारे तसेच नवउद्योजकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
०००






















