पाण्यामुळे दोन मार्गिकाच वाहतुकीसाठी खुल्या- डॉ. अनिलकुमार गायकवाड
marathinews24.com
पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात सोमवारी (दि.६)सकाळी झालेली दरड कोसळण्याची घटना ही पूर्णपणे नैसर्गिक आपत्ती असून, तिचा बोगद्याच्या कामाच्या गुणवत्तेशी किंवा अन्य कोणत्याही तांत्रिक त्रुटीशी संबंध नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले. डोंगरावरून मोठ्या वजनाचा दगड घरंगळत खाली आल्याने ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात वाहतूक पोलिसांचे प्रसंगावधान, टेम्पो चालकाचा वाचवला जीव – सविस्तर बातमी
लोणावळा परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या विक्रमी पावसानंतर सोमवारी सकाळी मिसिंग लिंक बोगद्याच्या परिसरात अचानक दरड कोसळली. दरडीसोबत मोठा दगड खाली आल्याने मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा राडारोडा द्रुतगती मार्गावर पसरला. या दगडाच्या धडकेमुळे बोगद्याच्या प्रवेशद्वारावरील गर्डरचे नुकसान झाले. घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत राडारोडा हटविण्याचे काम हाती घेतले. नुकसान झालेला गर्डरही काढून टाकण्यात आला असून परिसर सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.
दरड कोसळल्यानंतर बोगद्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, या सर्व शक्यता फेटाळून लावत डॉ. गायकवाड यांनी ही घटना नैसर्गिक कारणांमुळेच घडल्याचे स्पष्ट केले. डोंगरावरील मोठा दगड घरंगळत खाली आल्याने हा अपघात झाला असून, बोगद्याच्या बांधकामातील गुणवत्ता किंवा इतर कोणत्याही तांत्रिक बाबीचा या घटनेशी संबंध नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
याशिवाय बोगद्याच्या सुरुवातीच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत असून ते वाहत येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा नेमका स्रोत शोधणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पाऊस थांबल्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने झिरपणाऱ्या पाण्याचा उगम शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दरड कोसळल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित भागातील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. सध्या रस्त्यावर पडलेला राडारोडा हटविणे, नुकसान झालेल्या संरचनेची दुरुस्ती, तसेच संपूर्ण परिसराची सुरक्षितता तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर आणि मार्ग सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर मिसिंग लिंक परिसरातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे, असेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
























