मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
marathinews24.com
पुणे – मराठी चित्रपट सृष्टीत आशय संपन्नता आहे; परंतु कल्पनाशक्ती आणि दृश्यात्मकतेचा अभाव आढळतो. दुसऱ्या सारखे करायला न जाता आपल्या सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत चित्रपट निर्मिती केल्यास मराठी चित्रपट सृष्टीलाही यश मिळेल, असा विश्वास प्रसिद्ध अभिनेते गश्मीर महाजनी यांनी व्यक्त केला. मुंबा फिल्म फाऊंडेशनतर्फे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सहाव्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रविवारी (दि. २८) चर्चासत्रात ते बोलत होते.
छायाचित्रामागची दृष्टी महत्वाची – डॉ. गो. बं. देगलूरकर – सविस्तर बातमी
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे हे चर्चासत्र झाले. केरळ येथील चित्रपट निर्माते अर्जुन अजित, लघुपट निर्माते मयूर कुलकर्णी, लेखक हेमंत बेळे, दिग्दर्शक सुजय डहाके आणि गश्मीर महाजनी यांचा सहभाग होता. त्यांच्याशी अभिषेक अवचार यांनी संवाद साधला. गश्मीर महाजनी म्हणाले, मराठी चित्रपट सृष्टीने आपले क्षितीज रुंदावत काम केल्यास केल्यास सर्व स्तरातील प्रेक्षकांना आकर्षित करेल.
सुजय डहाके म्हणाले, मला चित्रपट या विषयावर लिहायला आवडत होते. माझ्यातील सृजनशीलता मला पुस्तकी शिक्षण घेण्यापासून परावृत्त करत होती म्हणून मी या क्षेत्राकडे वळलो. अभिनेता किंवा दिग्दर्शक होण्याचे माझे स्वप्न नव्हते, परंतु या विषयावर सखोल अभ्यास करण्याची प्रचंड इच्छा असल्यामुळे मी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. माझ्या कामावर राजकीय प्रभाव नाही; परंतु प्रत्येक क्षेत्रात समाजकारण आणि राजकारण आहे असे मी मानतो.
अर्जुन अजित म्हणाले, नवनवीन विषयांवर चित्रपट निर्मिती होणे आवश्यक आहे. त्याकरिता कथा, पटकथा, चित्रपटाचा विषय, आशय यावर काम व्हावे. चित्रपट निर्माते आशयाला महत्त्व देत नाहीत हे अयोग्य आहे. वैविध्यपूर्ण आशयांवर चित्रपट निर्मिती करणे आव्हानात्मक आहे.
सर्जनशीलतेसाठी चित्रपट निर्मिती करावी..
मयूर कुलकर्णी म्हणाले, जाहिरात क्षेत्रात काम करताना सर्जनशीलतेला पुरेसा वाव मिळत नसल्याने मी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या हाताळल्या. आजच्या युवा पिढीने आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी जाहिरातीसारखी माध्यमे जरूर हाताळावीत; परंतु आपल्यातील सर्जनशीलता चित्रपट निर्मितीसाठी वापरावी.
हेमंत बेळे म्हणाले, आजचा काळ हा जाहिरात क्षेत्र आणि चित्रपट निर्मितीसाठी सुवर्णकाळ असून या क्षेत्रात अनेकविध संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात आपण केलेले सर्जनशील काम दर्शविण्यासाठी आज अनेक माध्यमे सहजतेने उपलब्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झाला तरीही जो पर्यंत कलाकारात सर्जनशीलता आहे तो पर्यंत या क्षेत्राला धोका संभवत नाही. चर्चासत्रात सहभागी कलाकार, लेखकांचा सन्मान वीरेंद्र चित्राव, विश्वास शेंबेकर, प्रियांका चौधरी, दत्ता गुंड, स्वप्नील कांबळे, नूतन कुलकर्णी यांनी केला.























