पीडितेशी व तिच्या वकिलांशी थेट संवाद साधत दिला धीर
marathinews24.com
मुंबई – खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी पती गीतेश राऊत, सासरे विनायक राऊत, शामल राऊत तसेच अन्य संबंधित व्यक्तींविरोधात मानसिक छळ आणि कौटुंबिक अत्याचाराचे गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांना लेखी निवेदन देखील दिले आहे.
ऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित – सविस्तर बातमी
शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी वर्षा जितेंद्र मोरे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क घडवून आणल्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गिरीजा राऊत यांच्याशी सविस्तर संवाद साधला. यावेळी गिरीजा राऊत यांनी त्यांच्यावर झालेल्या कथित मानसिक छळासह संपूर्ण घडामोडींची माहिती डॉ. गोऱ्हे यांना दिली. डॉ. गोऱ्हे यांनी त्यांना धीर देत, “या लढ्यात तुम्ही एकट्या नाही. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल,” असा विश्वास दिला.
संवादादरम्यान गिरीजा राऊत यांनी डॉ. गोऱ्हे महिलांसाठी राबवत असलेल्या ‘स्वमदत गट’ संकल्पनेचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे संकटग्रस्त महिलांना मानसिक आधार, आत्मविश्वास आणि न्यायासाठी लढण्याची ताकद मिळते. महिलांना सक्षम करण्यासाठी अशा संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
याखेरीज डॉ. गोऱ्हे यांनी गिरीजा राऊत यांच्या वकिलांशीही दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रकरणाच्या कायदेशीर बाजूची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणात कोणत्या कायदेशीर तरतुदी लागू होऊ शकतात, पुरावे अधिक सक्षमपणे कसे मांडता येतील आणि प्रकरण अधिक भक्कम करण्यासाठी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी चर्चा केली.
यावेळी गिरीजा राऊत यांना सरकारी वकील नियुक्त करण्यात आल्याची माहिती वकिलांनी डॉ. गोऱ्हे यांना दिली. त्यामुळे प्रकरण अधिक सक्षम, निष्पक्ष आणि प्रभावीपणे न्यायप्रक्रियेत पुढे जाण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महिलेने केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. प्रत्येक पीडित महिलेला न्याय मिळणे ही शासन आणि यंत्रणांची जबाबदारी आहे. या प्रकरणाची कोणताही राजकीय दबाव न येता सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. दोषी आढळणाऱ्या कोणालाही कायद्यापासून संरक्षण मिळता कामा नये.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या ‘लाडक्या सुनेचे रक्षण’ धोरणाचा उल्लेख करत डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक सून सुरक्षित असल्याची भावना निर्माण करण्यासाठी अशा धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. महिलांवरील मानसिक, शारीरिक किंवा सामाजिक अत्याचाराच्या प्रत्येक प्रकरणात शासनाने संवेदनशील आणि ठोस भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “गिरीजा राऊत यांच्यासारख्या महिलांनी स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवला, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. घरातील राजकीय किंवा आर्थिक दबावाची पर्वा न करता त्यांनी तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवले आहे. अशाच प्रकारे अन्याय सहन करणाऱ्या प्रत्येक महिलेने पुढे येऊन कायद्याची मदत घ्यावी. वेळेत आवाज उठविल्यास कौटुंबिक हिंसाचारामुळे महिलांना टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येणार नाही. अन्याय सहन करण्यापेक्षा त्याविरोधात लढणे हेच खरे धैर्य आहे आणि अशा प्रत्येक महिलेला समाज व शासनाचा आधार मिळालाच पाहिजे.”
























