भामा आसखेड धरणाच्या काठावर पडली वीज-तरुणाचा जागीच मृत्यू
marathinews24.com
पुणे– मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार (दि. २६) दुपारी अडीच वाजता पाईट येथील भामा आसखेड धरणाच्या काठावर घडली आहे. संतोष गुलाब खांडवे (वय ३०, रा. वेताळे) असे मृत युवकाचे नाव आहे.
राज्यात अवकाळी पावसाचे थैमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा – सविस्तर बातमी
खांडवे हे रौंधळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील धरणाच्या परिसरात मासेमारी करत असताना अचानक वीज कोसळली. वीज अंगावर पडल्याने त्यांच्या अंगावरील कपडे आणि मोबाईल जळून खाक झाले. डोक्यापासून पायापर्यंत उजवी बाजू पूर्णतः भाजलेली अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मित्रांनी तात्काळ पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला दाखल केले. मात्र प्राथमिक तपासणीनंतर पुढील कार्यवाहीसाठी त्याला चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनेनंतर पाईट मंडल अधिकारी एम. एस. सुतार, ग्राममहसूल अधिकारी एम. जी. क्षीरसागर, ग्रामपंचायत अधिकारी ए. एन. फुलपगर, मा. उपसरपंच जयसिंग दरेकर यांच्यासह दीपक डांगले, अनिल रौंधळ, विपुल खेंगले, कबीर रौंधळ, हरिभाऊ रौंधळ, नवनाथ डांगले आदींनी घटनास्थळी भेट दिली. मृत युवकाच्या नातेवाईकांना तात्काळ शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, तसेच पाईट परिसरात किमान पाच किलोमीटर अंतरासाठी वीज प्रतिबंधक टॉवर बसवावेत, अशी मागणी जयसिंग दरेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.