विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांचे आवाहन
marathinews24.com
पुणे – पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२५-२६ करिता केळी, मोसंबी, पपई, संत्रा, आंबा व डाळिंब या पिकांसाठी सहभागी होण्यासाठी https://www.pmfby.gov.in या राष्ट्रीय फळ पीक विमा पोर्टलवर विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
रसिकांसाठी ‘स्वरयज्ञ’ ठरली सांगीतिक पर्वणी – सविस्तर बातमी
ही योजना पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे मार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी द्राक्ष पिकासाठी १५ ऑक्टोबर, केळी, मोसंबी, पपईसाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा पिकासाठी ३० नोव्हेंबर, आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर व डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२६ याप्रमाणे अंतिम मुदत राहील. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होणार आहेत किंवा नाही याबाबत घोषणापत्र भरुन देणे आवश्यक राहील.
योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी अधिसूचित फळबागांचे प्रती शेतकरी कमीत कमी २० गुंठे व जास्तीत जास्त ४ हेक्टर इतके उत्पादनक्षम क्षेत्र असणे आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, फळबागेचा जिओ टँगिंग फोटो, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार, ई-पीक पाहणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.





















