भालबा केळकर नाटिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ
marathinews24.com
पुणे – मुलांमधील चमक आणि कौशल्य फुलविण्याचे कार्य जसे भालबा केळकर नाटिका स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे त्याच प्रमाणे त्यांचा व्यक्तिमत्व विकासही घडत आहे. स्पर्धेत असणारी शिस्त मुलांची उत्तम जडणघडण करीत त्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी भान ठेवण्याचे शिक्षण आणि संस्कारांची शिदोरी देईल, असा विश्वास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कलावर्धिनीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांनी व्यक्त केला.
‘मेक इन इंडिया’च्या स्वप्नपूर्तीसाठी जर्मनीतून भारतात परतलो – सविस्तर बातमी
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि. १५) भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. शेठ बोलत होते. महाराष्ट्रीय कलोपासकचे उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी, नाट्य संस्कार कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पारखी, गंगोत्री डेव्हलपर्सचे मकरंद केळकर, स्पर्धेचे परिक्षक अरविंद सीतापुरे, राजश्री राजवाडे-काळे, वंदना गरगटे मंचावर होते. पारितोषिक वितरण समारंभापूर्वी स्पर्धेतील विजेत्या नाटिकांचे सादरीकरण झाले. विद्यार्थ्यांनी पारितोषिक स्वीकारताच एकच जल्लोष करीत आनंद व्यक्त केला.
डॉ. दिलीप शेठ म्हणाले, मोबाईलमध्ये गर्क असलेली मुले त्यापासून दूर जाऊन स्पर्धेच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करीत आहेत. त्यांना दिलेली भूमिका उत्तम रितीने सादर करीत असतानाच सहजीवन, इतरांशी जुळवून घेण्याची सवय यातून ते उत्तम नागरिक म्हणून घडतील.
प्रकाश पारखी म्हणाले, मुलांना आनंद मिळावा म्हणून भालबा केळकर नाटिका स्पर्धा सुरू करण्यात आली. या स्पर्धांमधून मुलांचा व्यक्तिमत्व विकास होत असून त्यांना व्यक्त होण्याचे साधन उपलब्ध होत आहे. अभ्यास मनोरंजक व सोपा करण्याच्या दृष्टीने अभ्यासनाट्य चळवळीविषयी त्यांनी माहिती दिली. उपक्रमास शुभेच्छा देऊन मकरंद केळकर यांनी स्पर्धा पुढे नेणाऱ्या शिक्षक व पालकांचे कौतुक केले.
परिक्षकांच्यावतीने मनोगत व्यक्त करताना वंदना गरगटे म्हणाल्या, बालरंगभूमीच्या माध्यमातून उद्याचे उत्तम नागरिक घडत आहेत. भालबा केळकर नाटिका स्पर्धेतील शिस्तबद्धतेतून मुलांची उत्तम जडणघडण होत असून सादरीकरण करताना मुलांना आनंदही घेता आला पाहिजे. छोटासा विषय चांगल्या पद्धतीने खुलवत, कल्पकता आणि मार्मिकता साधत सादरीकरण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मान्यवरांचे स्वागत डॉ. सुहास जोशी यांनी केले. निकालपत्राचे वाचन ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले तर सूत्रसंचालन अवंती लोहकरे यांनी केले. आभार अभिजित देशपांडे यांनी मानले.




















