भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून निवासासह आवश्यक सुविधांची व्यवस्था
marathinews24.com
पुणे – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसामुळे देहू-आळंदी परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी व भाविकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे केलेले आवाहन लक्षात घेऊन, शिवसेना नेत्या व मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही वारकऱ्यांनी सध्या देहू व आळंदी येथे गर्दी टाळावी आणि शक्यतो पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
आज (दि. ७) जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूहून, तर उद्या (दि. ८) दुपारी ३ वाजता आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. मात्र, इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पूल, रस्ते आणि वाहतूक विस्कळीत झाली असून, वॉटरहाऊस, दर्शनबारी, मोबाइल शौचालये आणि अन्य व्यवस्था पुरामुळे बाधित झाल्याने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे.
आळंदीतील पालखी प्रस्थान सोहळा केवळ निमंत्रित मानकरी, मानाचे खांदेकरी, कर्मचारी, आरोग्य व स्वच्छता कर्मचारी आणि पोलिस अशा एकूण १,६६० जणांच्या मर्यादित उपस्थितीत होणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच पुण्यातील संगमवाडी येथेही वारकऱ्यांनी गर्दी टाळावी, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
सध्याच्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी आपत्कालीन उपाययोजना राबवल्या आहेत. महापालिकांच्या शाळांमध्ये वारकऱ्यांसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज, वैद्यकीय मदत, अन्नाची व्यवस्था तसेच आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी आणि इतर यंत्रणा सतत कार्यरत असून, वारकऱ्यांनी सुरक्षित स्थळी थांबून या सुविधांचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.























