जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या सूचना
marathinews24.com
पुणे – ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता सर्व संबंधित यंत्रणेमध्ये समन्वय साधून कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या पुर्वनियोजन बैठकीत दिल्या. यावेळी समिती सदस्य व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
सावित्रीमाईच्या शेकडो लेकींनी केला संविधानाचा जागर – सविस्तर बातमी
शासन, महसुल व वन विभागाच्या शासन निर्णय दि. १४ डिसेंबर २०२५ अन्वये ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरु करण्यात आलेली असून, सदर योजना राबविण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांकरिता शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी आदी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते उपल्बध करणे आहे.
या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर महसूल मंत्री, जिल्हास्तरावर पालकमंत्री आणि विधानसभा क्षेत्रस्तरावर विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ही योजना महसूल विभागामार्फत राबविण्यात येणार असून संबधित ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद (बांधकाम विभाग), प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभाग आणि वन विभाग यांसारख्या विविध यंत्रणा कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार आहेत.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, असे रोहयो शाखेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.























