आमदार बाबुसिंगजी महाराज यांचे निर्देश
marathinews24.com
पुणे – श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचा संदेश ‘हिंद-दी-चादर’कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्यसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमाकरिता येणाऱ्या भाविकांची सुरक्षा, पाणीपुरवठा, भोजन, निवास, वाहतूक, स्वच्छता, रुग्णवाहिका, प्रथमोपचार संच आदी बाबींची चोख व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनानेही चोखपणे नियोजन करुन कार्यवाही करावी, असे निर्देश धर्मगुरु तथा आमदार, राज्यस्तरीय समन्वय समितीचे अशासकीय सदस्य प.पु. बाबुसिंगजी महाराज यांनी दिले.
हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली, यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘हिंद-दी-चादर’कार्यक्रम राज्यस्तरीय समन्वय समितीचे अशासकीय सदस्य तथा कॅम्प येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग साहनी, विशेष निमंत्रित सदस्य रमेश चव्हाण, लबाना समाजाचे अध्यक्ष संतोकसिंग लबाना, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी कांबळे, रमेश राठोड, आकाश राठोड आदी उपस्थित होते.
बाबुसिंग महाराज म्हणाले, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा यापूर्वी ‘हिंद-दी-चादर’कार्यक्रम नागपूर आणि नांदेड येथे संपन्न झाला असून शीख, सिंधी, सिकलीगर, लबाना, बंजारा, मोहयाल आणि गुरुनानक नाम लेवा संगत-समुदायांचे नागरिक लाखोच्या संख्यनेने उपस्थित राहून गुरुवाणीचा लाभ घेतला. अशाच भव्य कार्यक्रम २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदिनाथ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. देशभरातून लाखो भाविक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
भारत देश संत ही संताची भुमी आहे. हीच संतपंरपरा जपत तसेच या ऐतिहासिक कार्यक्रमाचे महत्व लक्षात भाविक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, जिल्ह्यातून अधिकाधिक भाविक या कार्यक्रमाकरिता राहण्याच्यादृष्टीने नियेाजन करावे, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लोकप्रतिनिधी, विविध समाजाचे प्रतिनिधी आदींनी मिळून समन्वयाने काम करावे, अशा सूचना श्री. बाबुसिंग महाराज यांनी केली.
साहनी म्हणाले, ‘हिंद-दी-चादर’कार्यक्रमाच्या माध्यमातून खारघर येथे जाणाऱ्या भाविकांकरिता बसेस, अल्पोहार, पाणी आदी व्यवस्था करण्यात आली आहे. बसेस सकाळी ६ वाजता निघणार आहेत. भाविकांनी जवळच्या गुरुद्वारा, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन साहनी यांनी केले आहे.
कांबळे म्हणाले, कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्त, पुणे विभाग व जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आढावा बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर कार्यक्रमाची प्रचार व प्रसिद्धी करण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश देण्यात आलेले आहेत, असेही कांबळे म्हणाले.
यावेळी प्रतिनिधींनी कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना करण्यात आल्या, यावर बाबुसिंगजी महाराज यांनी प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
























