निगडे खुर्द,केळंद, पिशवी, करणावडमधील २०० विद्यार्थ्यांना रेनकोट, शैक्षणिक साहित्य; महिलांना १०० छत्र्यांचे वाटप
marathinews24.com
पुणे – तोरणा आणि राजगडाच्या कुशीत वसलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाताना अडचणी येऊ नयेत, तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. निगडे खुर्द येथे झालेल्या या उपक्रमात केळंद, पिशवी आणि करणावड या डोंगरदऱ्यांतील गावांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांना रेनकोट, खाऊ आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच परिसरातील महिलांना १०० छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभ – सविस्तर बातमी
डोंगराळ आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन दुर्गम प्रतिष्ठानने हा उपक्रम आयोजित केला. विद्यार्थ्यांना रेनकोट आणि शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. महिलांनाही छत्र्या देण्यात आल्याने त्यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रेनकोट, तर महिलांनी छत्र्यांचा वापर करून पावसापासून बचाव केला. त्यामुळे वाटप करण्यात आलेल्या साहित्याची उपयुक्तता कार्यक्रमस्थळीच अधोरेखित झाली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रसाद खंडागळे, अध्यक्ष नंदकुमार जाधव, तसेच स्वाती शेठ आणि संतोष पंडित यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी श्रीकांत मोरे, सुनंदा मोरे, रश्मी जाधव, अश्विनी शेळके, स्वाती वाडेकर, सुनील जगताप, रवींद्र पठारे, विजय जगताप, गणेश काळे, शांताराम वाडेकर, सिद्धेश जाधव, दिलीप तायडे, संजय ऐलवाड , रुपेश कोळस आणि प्रतीक कोंढाळकर यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर ग्रामस्थांच्या वतीने उपस्थितांसाठी बेसन-भाकरीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि पावसाळ्यात आवश्यक वस्तू उपलब्ध करून देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.























