वाहतूक नियोजनाबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची माहिती
marathinews24.com
पुणे – ‘पुण्यातील वाहतूक नियोजनासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) प्रकल्प अंतिम टप्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुण्यातील वाहतूक सुरळीत ठेवणे; तसेच बेशिस्तांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध त्वरित दंडात्मक कारवाई (ई-चलन) करण्यात येणार आहे’, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.
‘साॅफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे’ (सीप) कडून आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे सोशल इम्पॅक्ट डायलाॅग’ कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील बोलत होते.
‘ग्लोबल सस्टेनिबिलिटी इम्पॅक्ट कोच’ आणि ‘सेवा ब्रिज फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण डी. एम., पिनॅकल इंडस्ट्रीजचे संस्थापक, अध्यक्ष डाॅ. सुधीर मेहता, क्लायमेंट टूपर्स फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नटराजन, सिम्बायोसिसच्या मेडिकल आणि हेल्थ सायन्स विभागाचे कुलसचिव प्रा. राजीव येरवडेकर, ‘सीप’चे अध्यक्ष शिवराज साबळे, उपाध्यक्ष शिवेश विश्वनाथ, माजी अध्यक्षा विनिता गेरा, व्यवस्थापकीय समिती सदस्य बालचंद्र नामजोशी, अवंती कदम या वेळी उपस्थित होते.
मनोज पाटील म्हणाले, ‘पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. पुण्यातील क्षेत्रफळाचा विस्तार झाला आहे. गेल्या २० वर्षांत पुण्यातील क्षेत्रफळात ३३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्यांचे प्रमाण ११ टक्क्यांपर्यंत आहे. खासगी वाहनांची संख्या ७९ लाखांपर्यंत पोहोचली आहे. पुण्यातील वाहतूक व्यवस्था सक्षम, तसेच प्रभावी करण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजना हाती घेतल्या आहेत. वाहतूक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या योजना राबविण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, तसेच ‘आयटीएमएस’च्या माध्यमातून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध ई-चलनाद्वारे त्वरीत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील गर्दीचे ३२ रस्ते निश्चित करून तेथे वाहतूक विषयक कामे सुरू करण्यात आली आहेत.’
‘बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. शहरात नव्याने होणारे रस्ते, उड्डाणपुलांची माहिती घेऊन तेथील वाहतूक नियोजनाबाबत कामे करण्यात येत आहे. पुढील पाच वर्षांत पुण्यात मेट्रोसेवेचे जाळे १०२ किलोमीटरपर्यंत तयार होईल. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे गरजेचे आहे,’ असे पाटील यांनी नमूद केले.
किरण डी. एम., डाॅ. सुधीर मेहता, प्रा. राजीव येरवडेकर, विद्याधर पुरंदरे यांनी मनोगत व्यक्त केले. पूजा कुलकर्णी यांंनी सूत्रसंचालनक केले. शिवेश विश्वनाथ यांनी आभार प्रदर्शन केले.
























