देशमुख हत्याकांडातील चाटे बाहेर येताच राडा; गुन्हा दाखल
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींच्या दहशतीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. भावाच्या बाराव्याच्या विधीला जाण्यास न्यायालयाने आरोपी जयराम चाटेला दोन तासांची परवानगी दिली होती. मात्र तो बाहेर येणार असल्याचे समजताच तांबवा (ता. केज) परिसरात जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले. जयराम चाटे-कृष्णा आंधळेच्या टोळीकडून तांबव्यातील तरूणास जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. आरोपींनी मिरची पावडर टाकून लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. यात तरूण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पाच आरोपींवर हाफमर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी अपहरण करून क्रूरपणे हत्या झाली होती. या प्रकरणात गेल्या १४ महिन्यापासून जयराम माणिक चाटे (वय २२) हा तुरुंगात आहे. जयरामचा भाऊ श्रीराम माणिक चाटे याचा २ मार्चला दिव्यांगत्वामुळे घरात पडून असताना मृत्यू झाला होता. भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी हजर राहण्याची परवानगी जयराम चाटे याने वकिलामार्फत मागितली होती. न्यायालयाने परवानगी दिल्याने जयराम चाटे यास पोलीस बंदोबस्तात कारागृहातून शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास गावात आणण्यात आले. दोन तासात घरी भावाचा बाराव्याचा विधी उरकल्यानंतर दुपारी १.२२ वाजेच्या दरम्यान त्याला पुन्हा पोलीस बंदोबस्तात कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी, केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी जयराम चाटेला गावात आणण्यापूर्वी फौजदार लक्ष्मण कीर्तने, जमादार हनुमान मुंडे, फुलचंद सानप, डीएसबीचे शिवाजी कागदे, शहादेव म्हेत्रे यांच्यासह दोन अधिकारी, दहा कर्मचारी व होमगार्डचा बंदोबस्त तैनात केला होता. विशेष म्हणजे जयराम चाटे बाहेर येण्याच्या आदल्या दिवशी दुपारी पाच जणांनी संग्राम चाटे नामक तरुणाला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेचे नाव घेत धमकावले.
तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-१३१३ तुला दाखवतो असे म्हणत हल्ला केला. यामध्ये तरूण संग्राम चाटे गंभीररीत्या जखमी झाला असुन त्याच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी केज पोलिसात पाच आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न।केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी घडली घटना।तांबवा (ता. केज) येथील नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे (वय २५) हा १२ मार्च रोजी दुपारी १.३० ते २ वाजेच्या दरम्यान त्यांचा आदित्य वसंत बडे याच्यासह दुचाकीवरून शेतात जात होते. त्यांचा दुचाकीवरून पाठलाग करीत दया विलास चाटे व शरद परमेश्वर चाटे हे आले. तर समोरून एका दुचाकीवर अमोल अनिल ठोंबरे, सागर रामधन चाटे, गोट्या भालेकर हे तिघे आले. त्यांनी नरसिंग चाटे हा बसलेली दुचाकी अडविली. दया चाटे याने जुन्या भांडणाची कुरापत काढून आज तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत त्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने गळ्यावर कत्तीने वार करीत असताना नरसिंग याने पाठीमागे सरकून वार चुकवला. त्यांना मी तुमचे काय केले अशी विचारणा केली असता दया याने आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे १३१३ तुला दाखवतो. तुला आज जिवंत ठेवत नाही, तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, असे म्हणत आईवर शिवी देत त्याने कत्तीने डोक्यावर वार केल्याने गंभीर दुखापत झाली.
तर शरद चाटे याने मिरची पुड डोळ्यात टाकली. इतरांनी रॉडने त्याच्या पाठीत, खांद्यावर व मानेवर मारहाण केल्याने तो बेशुध्द झाला. त्यानंतर त्याचा मित्र आदित्य बडे याने तांबवा शिवारातील सानेगुरुजी विद्यालयाजवळ पाणी पाणी पाजल्याने शुध्द आली. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले. अशी तक्रार नरसिंग उर्फ संग्राम चाटे याने दिल्यावरून दया चाटे, शरद चाटे, अमोल ठोंबरे, सागर चाटे, गोट्या भालेकर या पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार सुकुमार बनसोडे हे पुढील तपास करीत आहेत.
गावात आणि परिसरात दहशत माजवण्याचा प्रकार
संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे हा न्यायालयाच्या परवानगीने काही तासांसाठी काल दोन जेलच्या बाहेर आला होता. तांबवा येथे तो भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी पोहोचला होता. मात्र तो बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या टोळीतील सदस्यांकडून गाव परिसरात तरुणावर हल्ला करत दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे.
जयरामची पुन्हा कारागृहात रवानगी
भावाच्या विधीसाठी जयराम चाटेला पोलिसांनी दोन तासासाठी गावात आणले, त्यानंतर पुन्हा त्याला कारागृहात नेण्यात आले आहे.
























