शेतकरी नेते राजू शेट्टी यांची आंदोलनाची हाक
marathinews24.com
ठाणे – जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यासह मुंबई, ठाणे, कल्याण ,डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर सारख्या वाढत्या शहरांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीए यांच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या काळू धरणाचा संघर्ष सद्या पेटण्याची चित्र दिसून येत आहेत. शनिवारी (दि.२३) काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था, काळू परिसर यांच्या तळेगांव येथील कार्यालयाला शेतकरी नेते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. प्रस्तावित काळू व शाई धरण बाधित क्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधींशी संवाद साधून आंदोलनाची दिशा तसेच धरणसंबंधी प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या हालचाली आणि त्यामुळे निर्माण झालेले शेतकरी प्रश्न याविषयी चर्चा केली.
सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात सर्वच काळू व शाई धरण परिसरातील नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर उतरण्याची तयारी करण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे . तसेच आगामी काळात प्रत्येकवेळी धरणग्रस्तांच्या पाठीशी उभे राहून, संघर्षात साथ देण्याचे आश्वासन राजू शेट्टी यांनी दिल्याचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी फनाडे यांनी सांगितले आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी धरण क्षेत्रातील जनसामान्यांच्या भावना उपस्थित शेतकरी प्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेतल्या. पुढील पंधरवड्यात श्रमिक मुक्ती संघटना आणि काळू व शाई धरणाच्या कृती समिती यांनी संयुक्तरित्या निश्चित केलेल्या दिवशी उपविभागीय अधिकारी कल्याण तथा भूसंपादन अधिकारी काळू प्रकल्प यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचां प्रशासनाला इशारा दिला.
याप्रसंगी काळू संघर्ष समितीचे पोपटराव देशमुख, हरिभाऊ राऊत , गणेश फनाडे, ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष विलासकाका देशमुख, शाई संघर्ष समितीचे उमेश वारघडे, हिरामण भोईर, ज्येष्ठ शेतकरी शिवाजी अण्णा देशमुख, शशी देशमुख, सुभाष चौधरी, चंद्रकांतदादा देशमुख, रघु तात्या देशमुख, अरुण चौधरी, रंगनाथ देशमुख, विश्वनाथ देशमुख, रामभाऊ देशमुख, आदिवासी प्रतिनिधी रमेश खाकर, भाऊ पारधी, पांडू खडके, माहिती अधिकार संघाचे जिल्हाप्रमुख संतोष राऊत, मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाचे सरचिटणीस संभाजी गोडांबे, उपसरपंच भावेश पठारे, युवा शेतकरी तानाजी देशमुख, तुषार देशमुख, बाळा आगिवले यांच्यासह काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















