ॲड. प्रमोद आडकर यांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरव
marathinews24.com
पुणे – महापुरुषांचा जन्म कोणत्याही जाती-धर्मात झाला असला तरी त्यांनी कधी जात-पात-धर्म याचा विचार न करता सत्याचा धर्म अवलंबिला. महापुरुषांच्या विधायक कार्याचा वारसा पुढे नेत, चांगल्या विचारांची बांधणी करत देशाची नव्याने उभारणी करण्याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
पुणेकर दीपाली अमृतकर-तांदळे ठरल्या ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’ – सविस्तर बातमी
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन शनिवारी (दि. ६) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका लता राजगुरू होत्या. रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज जवळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, मैथिली आडकर, ललिता सबनीस, कुणाल राजगुरू, मौलाना सुलतान शेख, गौतम बेंगाळे, भगवान धेंडे आदी उपस्थित होते. शाल, सन्मानपत्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते.
ॲड. प्रमोद आडकर यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, महापुरुषांनी सत्याचा धर्म अंगीकारला परंतु आज महापुरुषांचीही बहुजन-अभिजन अशी वाटणी झालेली दिसत आहे. सत्काराला उत्तर देताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, रमाईच्या चरणी डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच देशाला तारणार आहेत.
प्रास्ताविकात विठ्ठल गायकवाड म्हणाले, रमाई महोत्सवाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ॲड. प्रमोद आडकर गेली अनेक वर्षे करत आहे. त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ लक्षात घेऊन त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे. मान्यवरांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन लता राजगुरू यांनी केले.






















