प्रा. खाडे यांचे कथाविश्व द्वंद्वात्मक अनुभवांना सामोरे जाणारे- डॉ. श्रीपाल सबनीस

प्रा. रामचंद्र खाडे लिखित ‘पुण्याई’ कथासंग्रहाचे प्रकाशन

marathinews24.com

पुणे – लेखक रामचंद्र खाडे यांचे कथाविश्व कोणत्याही अर्थाने एकांगी नाही. ते संमिश्र स्वरुपाचे आहे. जीवनसन्मुख व्यक्तिचित्रांचे, सकारात्मक आणि संवेदनशील लेखन हे त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे कथालेखन जीवनातील द्वंद्वात्मक अनुभवांना सामोरे जाणारे आहे, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. खाडे यांच्या कथा ग्रामीण मातीची नाळ जपणाऱ्या तसेच ग्रामीण संस्कृतीचे अंतरंग सक्षमपणे मांडणाऱ्या आहेत, असेही सबनीस म्हणाले.

वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम – सविस्तर बातमी

एपीके पब्लिशर्सतर्फे प्रकाशित, लेखक रामचंद्र खाडे लिखित ‘पुण्याई’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात डॉ. सबनीस बोलत होते. लेखक प्रा. रामचंद्र खाडे, संगीता खाडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. केशव देशमुख, खाडे यांचे गुरू अर्जुनराव सानप, लेखिका वृषाली आठल्ये, बाल साहित्यकार प्रा. मदन हजेरी, प्रकाशक अनघा कऱ्हाडे तसेच आयोजक सूरज व धीरज खाडे उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आज (दि. ३०) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. सबनीस म्हणाले, खाडे यांच्या कथासंग्रहाचे शीर्षक संस्कृतीचे संचित जपणारे आहे. निर्णायक मूल्यात्मकता पुण्याई या शीर्षकातून व्यक्त होते. त्यांचे लेखन परिपक्व जाणिवा व्यक्त करणारे आहे. त्यांच्या विविध कथांमधून समृद्ध जीवनानुभव, सूक्ष्म निरीक्षण आणि प्रतिभेचे दर्शन घडते. त्यांनी माणसांचे अंतरंग वाचले आहेत. त्यांची व्यक्तिचित्रे एकांगी नाहीत. सर्व प्रवृत्तींची माणसे त्यांच्या लेखनाचे विषय आहेत. त्यांच्या लेखनाला प्रादेशिकतेच्या मर्यादा नाहीत. परिणामी सांस्कृतिक संचित विकसित करणारा हा लेखक आहे.

डॉ. देशमुख म्हणाले, खाडे यांच्या कथांना मातीचा सुगंध, सौंदर्याची ओढ आहे. माणसांप्रमाणेच खाडे यांनी भवताल, निसर्ग, पशुपक्षी यांचेही सम्यक वाचन केले आहे. त्यांच्या कथा, शैली अकृत्रिम आहेत. ते कुणाचेही अनुकरण वा प्रभाव दर्शवत नाहीत. लेखक म्हणून त्यांच्यापाशी न्यायबुद्धी आहे.

सुनीताराजे पवार म्हणाल्या, खाडे यांच्या कथा अस्सल ग्रामीण जीवन मांडणाऱ्या आहेत. ग्रामीण जीवनातले वैविध्य, वास्तव त्यांच्या कथांमधून प्रकटते. नेमके निरीक्षण, अनुभवांचे भांडार आणि लेखकाला आवश्यक असणारी तटस्थ वृत्ती, यातून त्यांचे कथाविश्व वाचकांना खिळवून ठेवते.

मनोगत मांडताना प्रा. रामचंद्र खाडे म्हणाले, माझ्या लेखनाचा आधार हा अनुभव आहे. आपले अनुभवच शब्दरूप घेतात, असा माझा ठाम विश्वास आहे. डोंगरकपारीतल्या माझ्या गावाने मराठी साहित्यात उत्तम बंडू तुपे यांसारखे लेखक दिले. आनंद यादव, रा. रं. बोराडे यांच्या आशीर्वादाने मी लिहायला सुरवात केली. वाचनाने मला समृद्ध केले.

वृषाली आठल्ये यांनी मराठी साहित्यातील कथालेखनाचा आढावा घेतला. खाडे यांच्या लेखनात नवोदितपणा अजिबात नाही. प्रवाही मांडणी, सुस्पष्ट शेवट, विषयांचे वैविध्य, चित्रमय वर्णने हे त्यांच्या लेखनाचे विशेष आहेत, अंसे त्या म्हणाल्या. तसेच अर्जुनराव सानप यांनी आशीर्वादपर मनोगत मांडताना खाडे यांनी कादंबरी लेखनही करावे, असे सुचवले. खाडे यांचे जीवनानुभव विलक्षण आहेत. त्या अनुभवांना उत्तम निरीक्षण, प्रतिभा आणि शैलीची जोड मिळाल्याने कथा वाचनीय झाल्या आहेत, असे मत मदन हजेरी यांनी व्यक्त केले.

स्वागतपर प्रास्ताविकात संगीता खाडे यांनी कथासंग्रह प्रकाशनाचा दिवस हा कुटुंबियांसाठी आनंदसोहळा असल्याची भावना व्यक्त केली.कुंडीतील वृक्षावर जलाभिषेक करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. दिनेश फडतरे यांनी सूत्रसंचालन केले तर सूरज खाडे यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×