भाविकांच्या सहभागासाठी समन्वयाने नियोजन करा – अप्पर जिल्हाधिकारी सतिश राऊत
marathinews24.com
पुणे – श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने खारघर, नवी मुंबई येथे दि. २८ फेब्रुवारी २०२६ व १ मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील भाविकांना घेऊन जाण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी सतिश राऊत यांनी दिल्या.
राज्यात शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना – सविस्तर बातमी
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त तुषार बाबर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदाडे, पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, पुणे महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक डॉ. किरण सोनटक्के, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विनायक साखरे, साहनी चरणजित सिंग तसेच गुरुद्वारा प्रशासकीय प्रमुख व समाज प्रतिनिधी उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, जिल्ह्यात कार्यक्रमाच्या माहितीसाठी ठिकठिकाणी फलक उभारावेत. जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी व्यापक प्रसिद्धी व नियोजन करावे. शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करावे.
कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांची नावे व संपर्क क्रमांकासह यादी संबंधित गुरुद्वारा प्रशासकीय प्रमुखांनी तयार करून प्रशासनास सादर करावी. तसेच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व अन्य संबंधित विभागांनी भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
भाविकांसाठी पुरेशा बसेसची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी, पिण्याचे पाणी, नाश्ता व जेवणाची सोय करण्यात यावी. कार्यक्रमासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांना सुरक्षितरित्या ने-आण करण्यासाठी सुयोग्य व शिस्तबद्ध नियोजन करावे, असेही श्री. राऊत यांनी सांगितले.
























