सुहास शिरवळकर हे मराठी साहित्यसेवेसी तत्पर लेखक- सुबोध भावे

‘अस्तित्व’, ‘सुहास शिरवळकरांच्या कविता’ पुस्तकांचे प्रकाशन

marathinews24.com

पुणे-सुहास शिरवळकर यांच्या लेखणीतून टोकदार उपरोध, सामाजिक जाणिवांविषयी प्रगल्भता पावलोपावली जाणवते. त्यांच्या कवितांमधून अर्थपूर्णता, तत्त्वज्ञान आणि दृश्यात्मकताही दिसून येते. माझ्या दृष्टीने मराठी लेखकांमधील रॉकस्टार म्हणजे सुहास शिवळकर होत, असे गौरवोद्‌गार प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांनी काढले. सुहास शिरवळकर हे मराठी साहित्यसेवेसी तत्पर लेखक होते. भाषेची गोडी लावणाऱ्या साहित्यिकांपैकी साहित्यिक म्हणजे शिरवळकर आहेत. स्वत:चा शोध घेण्याची जाणीव तसेच कल्पकता आणि शोधक नजर शिरवळकर यांच्या कवितांमध्ये दिसते, असे मत प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केले.

अनुसूचित जाती- जमातीच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आयोग कटिबद्ध- उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम – सविस्तर बातमी

दिलीपराज प्रकाशनतर्फे सुहास शिरवळकर यांच्या ‘अस्तित्व’ आणि ‘सुहास शिरवळकरांच्या कविता’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी (दि. ३०) वैभव जोशी आणि सुबोध भावे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर, दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे मंचावर होते. कार्यक्रम टिळक रोडवरील संचेती सभागृहातील नितू मांडके हॉलमध्ये झाला.

वैभव जोशी म्हणाले, शब्दबंबाळ न होता कुठे थांबायचे हा गुण शिरवळकर यांच्या कवितेत दिसून येतो. माझे व्यक्तीमत्त्व बदलण्याचे काम शिरवळकर यांच्या कथांमुळे झाले. मी त्यांच्या साहित्यकृतींमधून जगायला शिकलो. शिरवळकर यांच्या लेखनात दृश्यात्मकता असल्याने विविध ठिकाणांचे समग्र दर्शन घडते. माझ्या दृष्टीने शिरवळकर म्हणजे एक ते ५१ क्रमांकावर असलेले एकमेव साहित्यिक आहेत. त्यांच्या दीपस्तंभाची उब मी सोलापूरात राहूनही घेत राहिलो. ज्या लेखकाच्या लेखनाने मी वेडावला जाऊन वाचनालयातून पुस्तके लंपास करू लागलो ते माझे आवडते लेखक म्हणजे सुहास शिरवळकर होत.

सुबोध भावे म्हणाले, आवडत्या लेखकाची कादंबरी प्रकाशनापूर्वी वाचायला मिळणे आणि त्याचे प्रकाशन आपल्या हस्ते होणे म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद इतरांना देण्याआधी आजीने चव बघायला देण्यासारखे आनंददायी आहे. ‘अस्तित्व’ कादंबरीतून नाटकाविषयी झालेले खोलवर व उत्कट लिखाण अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले गेले आहे. त्यामुळे पुढील काळात ही कादंबरी विद्यापीठाच्या नाटक विभागात अभ्यासक्रमात येऊ शकते.

शालेय व महाविद्यालयीन काळात आम्ही सुहास शिरवळकर यांच्या कथा-कादंबऱ्या नुसत्याच वाचल्या नाहीत तर त्यांच्या कथांमधील पात्रं जगलो आहोत, असे सुबोध भावे यांनी आवर्जून सांगितले. राजीव बर्वे यांनी सुहास शिरवळकरांबरोबर असलेले मैत्र उलगडत त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. वाङ्‌मय चोरीचा एकही आरोप नसलेला लेखक म्हणजे सुहास शिरवळकर होत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. अभ्यासपूर्ण लेखनातून कथानक गुंफत वाचकांची उत्कंठता वाढवत त्यांना गुंतवून ठेवणे ही शिरवळकर यांच्या लेखनाची उल्लेखनीय शैली होय, असेही ते म्हणाले.

पुस्तक निर्मितीस सहाय्य करणारे राजीव जोशी, अजित सातभाई, श्रीनिवास भणगे यांचा सत्कार सुगंधा शिरवळकर यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत मधुमिता बर्वे, राजीव बर्वे यांनी केले. सुहास शिरवळकर यांच्या साहित्यकृतींवर भरभरून प्रेम करणारे वाचक व सुहृद मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. प्रास्ताविक प्रबोध शिरवळकर यांनी केले तर आभार सम्राट शिरवळकर यांनी मानले. सूत्रसंचालन मधुर बर्वे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×