‘नाटकावर बोलू काही’मध्ये मान्यवरांचे मत
marathinews24.com
पुणे – मराठी नाटकांचा प्रेक्षक हा देशभरात सर्वाधिक प्रगल्भ असल्याचे मत नाट्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले. निमित्त होते ते बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बालगंधर्व महोत्सवात झालेल्या ‘नाटकावर बोलू काही’ या मुक्तसंवादांचे. या कार्यक्रमात पत्रकार आणि समीक्षक राज काझी यांनी जेष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांच्याशी संवाद साधला.
श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज – सविस्तर बातमी
महाराष्ट्रात पूर्वीपासून सामाजिक, साहित्यिक आणि सांगितीक चळवळी फार मोठ्या प्रमाणावर झाल्या. या चळवळीमुळे महाराष्ट्रातील नाटकांचा प्रेक्षक हा अधिक प्रगल्भ बनला, असे मत चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आणि बंगाल वगळता उर्वरित देशभरात आजही नाटकांचे विषय प्रामुख्याने रामायण, महाभारत आणि पुराणे यांच्यातील प्रसंगांवर आधारित असतात. महाराष्ट्रात मात्र वैविध्यपूर्ण विषयांवर मोठ्या प्रमाणावर नाटके सादर केली जात आहेत, याकडे विजय केंकरे यांनी लक्ष वेधले.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील आठ नाट्यगृहांमध्ये एकाच दिवशी नाटकांचे सर्व प्रयोग हाउसफुल झाले. राज्यभरातील माध्यमांमध्ये हा बातमीचा विषय ठरला. त्यावरून मराठी व्यावसायिक नाट्यक्षेत्राला पुन्हा एकदा ‘अच्छे दिन’ येत असल्याचे संकेत आहेत, असेही या संवादात बोलले गेले. कोरोना महामारीच्या काळात सर्व जग ठप्प झाले होते. या काळात प्रेक्षकांना दूरचित्रवाणी आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रंजनाची सवय लागली. मात्र, नंतरच्या काळात प्रेक्षकांमध्ये त्याबद्दलचा कंटाळा निर्माण झाला. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा नाटकासारख्या जिवंत कलाप्रकाराकडे वळले, असे केंकरे यांनी सांगितले.
सध्याच्या काळातील प्रेक्षकांना नाटकाची पहिली पंधरा-वीस मिनिटं केवळ प्रस्तावनेत खर्च करणे आवडत नाही. लवकरात लवकर नाट्यमय घटना रंगमंचावर सुरू व्हाव्यात, अशी त्यांची अपेक्षा असते, असे दामले यांनी नमूद केले.
पूर्वीच्या काळी नाटक हा देखील निव्वळ साहित्य प्रकार मानला जात असे. मात्र, मराठी रंगभूमीवर प्रामुख्याने संतोष पवार, देवेंद्र पेन आणि केदार शिंदे या नाटकांनी नाटकात दृश्याला अधिक महत्त्व प्राप्त करून दिले. त्यामुळे नाटकातील शाब्दिक विनोदांचा भर कमी होऊन प्रसंगनिष्ठ विनोदाचे प्रमाण वाढले. विशेषतः ’टूर टूर’ या नाटकापासून त्याची सुरुवात झाली, असे केंकरे यांनी निदर्शनास आणून दिले.
सध्याच्या काळात मराठी नाटकांच्या, विशेषतः एकांकिकांच्या लेखनावर स्कीट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रभाव दिसून येत असल्याचे निरीक्षण कुलकर्णी यांनी नोंदविले. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे वेगळे विषय स्वीकारण्याची प्रेक्षकांची मानसिकता घडली. त्यामुळे मराठी नाटकात देखील अनेक नवे नवे विषय येऊ लागले, अशी केंकरे यांनी सांगितले.
विनोदी नाटकांना मोठा प्रेक्षक वर्ग असला तरी देखील मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास पाहिल्यास अधिक काळ टिकलेली नाटके ही गंभीर विषयावर आधारित होती, असे प्रतिपादन केंकरे यांनी केले.
नाटकांमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन झाले पाहिजे तसेच नाटकांमुळे प्रेक्षक विचारप्रवण देखील झाला पाहिजे, असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
नाट्य क्षेत्रातील ६५ टक्के उलाढाल पुण्यात
पुण्यातील प्रेक्षक प्रगल्भ आणि चोखंदळ आहे. त्याचे नाटकावर प्रेम आहे. संपूर्ण मराठी नाट्य क्षेत्रातील तब्बल ६५ टक्के उलाढाल एकट्या पुणे शहरातून होत आहे, हे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
नाटकांना लावणारे यश हे केवळ त्यात स्टार कलाकार असल्यामुळे लाभत नाही. प्रेक्षकांच्या दृष्टीने नाटकाचा विषय, संहिता लेखन, अभिनय, नेपथ्य या बाबी देखील अधिक महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळेच नाटकाला यश प्राप्त होते. नाटकांच्या प्रसिद्धीसाठी आणि जाहिरातीसाठी सध्याच्या काळात अधिक साधने उपलब्ध असली तरी देखील नाटकांचे यश हे माऊथ पब्लिसिटीवरच प्रामुख्याने अवलंबून असते, असे दामले यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नाटकांचे प्रयोग फारसे होत नसल्याचा सूर चर्चेत उमटला. उपस्थितांनी व्यक्त केला. प्रामुख्याने सुसज्ज नाट्यगृहांचा अभाव आणि कलाकारांच्या तारखा मिळण्याची अडचण त्यामागे असल्याचे दामले यांनी स्पष्ट केले.
महापालिकांनी नाट्यगृहाची तारीख दिल्यानंतर ऐनवेळी ती रद्द करू नये, असे आवाहन दामले यांच्यासह सर्व रंगकर्मींनी यावेळी केले. नाटकांची तिकीट विक्री तब्बल २० दिवस आधीपासून सुरू होते. ऐनवेळी विशेषतः राजकीय कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाची दिलेली तारीख काढून घेण्याचा प्रकार केला जातो. त्यामुळे प्रेक्षकांचा विरस होतो आणि नाट्यनिर्मात्यांचे नुकसान होते, असे दामले यांनी निदर्शनास आणून दिले. अशा प्रकारांना विरोध करण्याचा एकमुखी निर्धार शेवटी जाहीर करण्यात आला.