पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आदरांजली
marathinews24.com
पुणे – ‘केसरी’ हे केवळ वृत्तपत्र नसून विचारपत्र आहे. राष्ट्रनिर्माणाच्या विचारांचा अखंड वाहणारा हा वारसा आहे. डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्यांचा वैचारिक वारसा शेवटच्या श्वासापर्यंत जपला आणि पुढे नेला. त्यांना मालमत्तेचा नव्हे, तर जबाबदारीचा वारसा मिळाला होता. अनेक संस्थांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. अडचणीच्या काळातही संस्थांना उभारी दिली. आयुष्यभर त्यांनी पत्रकारिता, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात स्तःहा झोकून दिले, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकारांनी गुरुवारी आदरांजली वाहिली.
अनेक वर्षांपासून अतिक्रमित शीवरस्ता खुला; विभागीय आयुक्तांकडून सरपंचांचे कौतुक – सविस्तर बातमी
पुणे श्रमिक पत्रकार संघ व पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने टिमविचे कुलपती व ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पत्रकार भवन येथे श्रद्धांजली सभा गुरवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्याध्यक्ष डॉ. गजेंद्र बडे, ‘केसरी’च्या विश्वस्त व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, ‘केसरी’चे विश्वस्त सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक, ‘केसरी’चे कार्यकारी संपादक निखिल गजेंद्रगडकर, सहसंपादक रामदास नेहुलकर, वृत्तसंपादक स्वप्निल पोरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी, मुख्य बातमीदार विजय चव्हाण, स्वप्निल बापट, कल्पना खरे यावेळी उपस्थित होते.
निखिल गजेंद्रगडकर म्हणाले, डॉ. टिळक यांना मालमत्तेचा नव्हे तर जबाबदारीचा वारसा मिळाला होता. त्यांनी अनेक संस्था संकटातून सावरत स्थिर केल्या आणि पुढे नेल्या. ‘केसरी’ हे केवळ वृत्तपत्र नसून विचारपत्र आहे. राष्ट्राच्या उभारणीसाठी ‘केसरी’चे मोठे योगदान आहे. डॉ. टिळक यांनी लोकमान्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला. बदलत्या तंत्रज्ञानुसार डॉ. टिळक यांनी केसरीचे आधुनिकीकरण करुन नावारुपाला आले. खर्या अर्थाने डॉ. टिळक यांनी लोकमान्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला.

स्वप्निल पोरे म्हणाले, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीकडे डॉ टिळक यांनी बारकाईने लक्ष ठेवून आपली ठाम भूमिका मांडली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून उंची गाठली आहे. 145 वर्ष असलेले ‘केसरी’ हे एकमेव देशभरातील अखंड सुरु असलेले दैनिक आहे. डॉ. टिळक यांनी केसरी अनेक बदल घडवून आणले. अडचणीच्या काळात त्यांनी केसरीला उभारी दिली.
शैलेश काळे म्हणाले, ‘डॉ. दीपक टिळक आणि कुटूंबिय यांचे पुणे पत्रकार भवनशी दीर्घकालीन ॠणानुबंध राहिलेले आहे. पत्रकार प्रतिष्ठान वास्तूसाठी टिळक परिवाराचा मोठा वाटा आहे. डॉ. संजय तांबट म्हणाले, माझी पत्रकारितेची जडघडण ‘केसरी’तून झाली. ‘केसरी’ हे पत्रकारांसाठी विद्यापीठ आहे. येथून अनेक नामवंत पत्रकार, संपादक घडतात. सर्वप्रथम सर्व नवनवीन प्रयोग ‘केसरी’ने केले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात विविध नवीन अभ्यासक्रम आणून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यात डॉ. टिळक यांचे मोठे योगदान आहे. अंकुश काकडे म्हणाले, जयंतराव टिळक, इंदुताई टिळक यांनी स्थापन केलेल्या संस्था डॉ. टिळक यांनी पुढे नेल्या. आणि त्या नावारुपाला आणल्या. जयंतराव टिळक यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वास्तूची उभारणी केली.
स्वप्निल बापट म्हणाले, काही लोक आजुबाजूला असले तरी त्यांचा अप्रत्यक्ष आधार असतो. त्यातील डॉ. दीपक टिळक हे होते. बातमीच्या रुपानी नाही. मात्र इतर कामांमुळे त्यांची ओळख झाली होती. त्यांनी मला विविध कामांसाठी आशिर्वाद दिला होता. आता त्यांचा सहवास नाही, संवादही होणार नाही, याची कायम मनात खंत राहिल.
ब्रिजमोहन पाटील म्हणाले, ‘लोकमान्यांच्या विचारांच्या ‘केसरी’त काम करण्याचे भाग्य मला लाभले. डॉ. टिळक हे कृतीशील व्यक्तीमत्व होते. ते सतत कामगारांच्या बाजूने विचार करीत असल्याचे त्यांनी आपला अनुभव आल्याचा यावेळी सांगितले.’ याप्रसंगी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली.






















