जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक संपन्न
marathinews24.com
पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून शनिवार दिनांक २० जून पासून विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही यशस्विरित्या राबविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्राधान्याने मतदार केंद्र प्रतिनिधी यांची नेमणूक करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पाटी (शरदचंद्र पवार गट), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार संख्या आहे. जिल्ह्यात एकूण ८ हजार ४१७ मतदान केंद्र असून आजअखेर ९० लाख ८४ हजार ०८८ इतकी मतदार संख्या आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये व अपात्र मतदार यादीत समाविष्ट होऊ नये या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत २० ते २९ जून या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण व गणना अर्ज प्रिटींग, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदार गणना अर्ज घरोघरी जाऊन वितरण, ५ ऑगस्ट रोजी तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करणे, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दावे आणि हरकती दाखल करणे, ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर- दाखल हरकतींवर सुनावणी व ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून दावे व हरकतींवर मंडल निहाय सुनावण्या घेण्यात येणार आहेत. सुनावणीची तारीख १० दिवस आधी जाहीर केली जाईल. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी क्षेत्रीय स्तरावर काम करण्याची गरज आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी वितरीत केलेले गणना अर्ज राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले अधिकृत मतदार केंद्र प्रतिनिधी मतदारांकडून घेऊन दिवसाला ५० अर्ज जमा करुन देऊ शकतात.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय आवश्यक आहे. मतदार याद्यांमधील जास्तीत जास्त त्रुटी, चुका दुरुस्त करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असेपर्यंत दर बुधवारी दुपारी १.३० वाजता राजकीय पक्षांची बैठक घेण्यात येणार आहे. त्याबैठकीस सर्व राजकीय पक्षांनी उपस्थित राहून क्षेत्रीय स्तरावरील अडचणी सादर कराव्यात, असे आवाहन डुडी यांनी केले.
श्रीमती कळसकर यांनी सादरीकरणाद्वारे संपूर्ण विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली. तसेच समाजातील विशेष घटकही या प्रक्रियेतून वगळला जाऊ नये यासाठी समाज कल्याण विभागाच्या मदतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सन २०२६ च्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेले तृतीयपंथी मतदार यादीतील पत्त्यावर राहत नसल्यास त्यांचा पत्ता या मोहिमे अंतर्गत शोधण्यात येऊन त्यांना गणना फॉर्म देण्यात येणार आहे. ८५ वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारही या गणनेपासून वंचित राहणार नाहीत. तसेच भोर, जुन्नर, मुळशी या आदिवासी भागातील कामानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या मतदारांनाही गणना फॉर्म देण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या असल्याचे श्रीमती कळसकर यांनी सांगितले.
यावेळी राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांचे जिल्हाधिकारी डुडी यांनी निरसन केले.






















