तुकारामांच्या अभंगांतून सकारात्मकता आणि सर्व परंपरांचा सन्मान – डॉ. समीर चव्हाण
marathinews24.com
पुणे – जगत् गुरू तुकाराम महाराज यांनी सर्व परंपरांचा आदर केल्याने त्यांची गाथा, अभंग अजरामर ठरले. तुकाराम महाराज यांनी भागवत, वैदिक, सुफी अशा सर्व संप्रदायांचा आणि परंपरांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांच्या वाङ्मयातून सकारात्मकता, सर्वसमावेशकतेचे दर्शन घडते, असे प्रतिपादन ‘अखईं ते जालें’ या व्दिखंडीय ग्रंथाचे लेखक डॉ. समीर चव्हाण यांनी केले.
बदलत्या काळाशी संवादी असले तरी भाषेचे मूळ रूप जपले पाहिजे : विजय कुवळेकर – सविस्तर बातमी
करम प्रतिष्ठानतर्फे आज (दि. २१) ग्रंथसन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात ‘अखईं ते जालें’चे लेखक डॉ. समीर चव्हाण यांचा गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर, निरुपमा महाजन, स्वयम् प्रकाशनचे शुभानन चिंचकर यांच्या उपस्थितीत डॉ. चव्हाण यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुलाखत सत्रात त्यांच्याशी वासंती वैद्य आणि वैजयंती आपटे यांनी संवाद साधला. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीस प्रास्ताविकात भूषण कटककर यांनी करम प्रतिष्ठानच्या वाटचालीचा आढावा सादर केला. मुक्ता भुजबले यांनी परिचय करून दिला तर ऋचा कर्वे यांनी मानपत्राचे वाचन केले.
गझल करत असताना आपल्याला भावणारे तुकाराम, त्यांच्यावर लिहिलेली काही टिपणे आणि मग मित्रमंडळींमध्ये होणाऱ्या चर्चांमधून अपघातानेच ग्रंथाची सुचलेली कल्पना याविषयी डॉ. चव्हाण यांनी सुरुवासीस सांगितले. तुकाराम गाथेची विविध रुपे, त्यांचे लेखक, विविध संदर्भ शोधण्यासाठी केलेले शोधकार्य आणि हिंदुस्तानी परिवेशातील तुकाराम महाराज यांचे लेखन त्यांनी नेमके उलगडले. संत तुकाराम महाराजांच्या लेखनात असलेली सकारात्मकता आणि त्यांच्या अभंगांचा विस्तार याविषयीही त्यांनी सांगितले. निरुपमा महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित मराठी गझल संमेलनात मिलिंद छत्रे, नचिकेत जोशी, वैशाली माळी, सुजाता पवार, अजय जोशी, चैतन्य कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी, योगेश काळे यांचा सहभाग होता. अध्यक्षस्थानी वैभव कुलकर्णी होते. प्राजक्ता वेदपाठक यांनी सूत्रसंचालन केले.






















