कात्रजमधील आंबेगाव परिसरातील घटनेने खळबळ
marathinews24.com
पुणे – प्रेम प्रकरणातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडे तक्रार दिल्याने महिलेच्या खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी
जावेद ख्वाजामियाँ पठाण (वय ३४, ख्वाजानगर, शनी मंदिराजवळ, भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संदीप रंगराव भुरके (वय २५) याच्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रौफ उस्मान शेख (वय ३५, सध्या रा.भूमकर चौक, नऱ्हे, मूळ रा. ख्वाजानगर, भोकर, जि. नांदेड ) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद पठाण हा फिर्यादी रौफ शेख याचा भाऊ आहे. जावेद पुण्यात एका ठिकाणी काम करत होता. तेथे त्याची आरोपी संदीप भुरके याच्या नात्यातील एका तरुणीशी ओळख झाली. ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपी संदीपने प्रेम प्रकरणास विरोध केला होता. सोमवारी (२२ डिसेंबर) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पठाण आंबेगाव परिसरातील गायमुख परिसरात थांबला होता. त्यावेळी आरोपी संदीप आणि त्याच्या साथीदारांनी त्याला गाठले. तरुणीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादातून आरोपी संदीप आणि त्याच्या बरोबर असलेल्या मित्राने जावेद याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
गंभीर जखमी झालेल्या जावेदला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. ‘आरोपी संदीप आणि त्याचा साथीदार पसार झाले असून, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे’, अशी माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली. पोलीस निरीक्षक गजानन चोरमले तपास करत आहेत.
























