जेजुरीत अपघात, ४ वारकरी महिला गंभीर जखमी
marathinews24.com
पुणे – श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात ३ वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे. तर ४ वारकरी महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात सोमवारी (दि.१३) सकाळी साडेआठच्या सुमारास सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्याजवळ घडला अहे. नंदा पवार (वय ६०, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली), माधवी राजाराम सलगरे (वय ५५, रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली), राजश्री शंकर भोसले (वय ५५, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली) अशी मृत्युमुखी पडलेल्या वारकरी महिलांची नावे आहेत.
अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट – सविस्तर बातमी
माउलींच्या पालखी सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ह.भ.प रंगनाथ महाराज पोखरबिसीकर यांची दिंडी सहभागी आहे. दिंडीतील ट्रक सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सासवड-जेजुरी रस्त्यावरून जात होता. त्यावेळी पालखी सोहळा सासवडजवळील बोरावके मळा परिसरात होता. पोलिसांनी वारकरी आणि वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरूपात दुभाजक टाकले होते. उजवी बाजू वाहनांसाठी तर डावी बाजू पायी जाणार्या वारकर्यांसाठी निश्चित केली होती. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील कसबे दिग्रज गावातील दिंडीतील ७ वारकरी महिला वाहनांसाठी निश्चित केलेल्या रस्त्यावर थांबल्या होत्या. त्याचवेळी बेलसर टोलनाक्याजवळ ट्रक चालकाने वारकरी महिलांना धडक दिली. अपघातात महिला गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तीन महिलांचा मृत्यू झाला. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, उपविभागीय अधिकारी अविनाश शिळीमकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
ट्रकचालक ताब्यात; प्रकृती अस्वस्थ असल्याचे उघड
‘अपघातप्रकरणी पोलिसांनी ७० वर्षीय ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली तेव्हा तो अत्यवस्थ होता. त्याने सर्दी, तापासाठी ओैषधे घेतले होते. दुसर्या वाहनाला ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात त्याने ट्रक अचानक डाव्या बाजूला वळविला. त्यामुळे धडकेत ७ वारकरी महिला गंभीर जखमी झाल्या. त्यातील तिघींचा मृत्यू झाला आहे.
– माउलींच्या पालखी सोहळ्यात शोककळा
ट्रकच्या धडकेमुळे झालेल्या अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. जेजुरी परिसरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी झाली. वारकरी महिलांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर भाविकांनी हळहळ व्यक्त केली. तसेच संपुर्ण पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली जखमींची भेट
पालखी सोहळ्यातील अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वारकरी महिलांची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांना आधार दिला. तसेच दिंडीतील वारकरी महिला, तसेच त्यांच्या नातेवाइकांची विचारपूस केली. ‘राज्य शासन संबंधित वारकरी महिलांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. जखमींवर आवश्यक ते उपचार करून त्यांना आवश्यक ती मदत करावी’, अशा सूचना पवार यांनी प्रशासनाला दिली.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जेजुरीजवळ झालेल्या अपघातात ३ वारकर्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत वारकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी वारकर्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्वरित घटनास्थळी रवाना झाले. संपूर्ण परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत दिली जाईल.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पालखी सोहळ्यात ट्रकच्या धडकेत ३ महिला वारकर्यांचा मृत्यू झाला असून, ४ महिला जखमी आहेत. अपघात नेमका कसा घडला, त्यास कारणीभूत ठरलेल्या सर्व बाजूंची चौकशी सुरू केली आहे. ट्रक चालकाच्या वर्तणूकीसह वैद्यकीय स्थितीची माहिती घेण्यात येत आहे.
– संदीपसिंग गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस दल
























