Breking News

महिला पत्रकारांची लेखणी जनसामान्यांसाठी तळपत राहो- महापौर मंजुषा नागपुरे

महिला पत्रकारांची लेखणी जनसामान्यांसाठी तळपत राहो- महापौर मंजुषा नागपुरे

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला पत्रकारांचा ‘आशा पुरस्काराने’ गौरव

marathinews24.com

पुणे – महिला माध्यमकर्मी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, अत्यंत समर्थपणे अन्यायाविरोधात लढत आहेत. महिला पत्रकारांची लेखणी अशीच सदैव जनसामान्यांसाठी तळपत राहो, त्याचप्रमाणे महिला पत्रकारांचे कार्य हे लिंगसमानतेचे उदाहरण ठरावे, अशी अपेक्षा महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केली.

‘सावित्री जत्रा’ महिलांना स्वावलंबी करणारी चळवळ-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – सविस्तर बातमी 

पत्रकारितेच्या क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या महिला पत्रकारांचा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला स्वानंद सोशल फेडरेशन, कोहिनूर ग्रुप व संवाद पुणेतर्फे ‘आशा पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवारी (दि. ७) आयोजित कार्यक्रमात प्रतिभा चंद्रन (नवभारत), नम्रता फडणीस (लोकमत), चैत्राली चांदोरकर (महाराष्ट्र टाइम्स), प्रज्ञा केळकर-सिंग (पुढारी), अंजली खमितकर (प्रभात), मेधा पालकर (सामना), प्रीती पाठक (भास्कर), सीमा चोरडिया-सांकला (आकाशवाणी) यांचा आशा पुरस्काराने गौरव करण्यात आला. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, स्वानंद सोशल फेडरेशनचे अध्यक्ष संजीव शहा, संवाद पुणेचे सुनील महाजन, साधना शहा, निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

महापौर नागपुरे म्हणाल्या, महिला पत्रकार या समाजाचा आरसा आहेत, अशा रणरागिणींचा गौरव हा माझाच सन्मान आहे, अशी माझी भावना आहे. पत्रकारितेचे क्षेत्र आव्हानांनी भरलेले आहे. तिथे काम करणाऱ्या महिलांना कुटुंब आणि पत्रकारिता, अशी दुहेरी जबाबदारी पेलावी लागते आणि समाजातील जळजळीत सत्य मांडावे लागते. पुरस्कारप्राप्त महिला पत्रकार हे कार्य करत आहेतच, त्यांनी स्वतःच्या माध्यमातून जनसामान्यांचा आवाज होत, अन्यायाविरोधात लेखणी आणि वाणीच्या साह्याने तळपत राहावे, या शुभेच्छा.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, स्त्रीशक्तीच्या अथांग, अफाट कर्तृत्वाला, त्यांच्या संघर्षाला अभिवादन करण्याचे औचित्य या पुरस्कारांनी केले असून, त्यासाठी संवाद संस्था व स्वानंद सोशल फेडरेशन यांचे विशेष कौतुक केले पाहिजे. पत्रकारितेच्या आव्हानात्मक क्षेत्रात दीर्घकाळ राहून हे आव्हान पेलणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही मानाचा मुजरा करतो. स्त्री कुटुंब, समाज, देश यांच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देते. त्यासाठी स्त्री सक्षमीकरण व सशक्तीकरणाला प्राधान्य दिले जावे.

महिला पत्रकारांच्या वतीने प्रतिभा चंद्रन यांनी प्रातिनिधिक मनोगत मांडले. पत्रकारितेचा प्रवास सातत्याने नवे शिकण्याचा, आव्हानांचा, वेळ मागणारा, जबाबदारीचे भान जागृत ठेवणारा आणि माणूस म्हणून संवेदनशीलता टिकवून ठेवण्याचा आहे. स्पर्धात्मक वातावरणात राहून विश्वासार्हता टिकवण्याची, सकारात्मक दृष्टीची जाणीव विकसित करण्याची इथे आवश्यकता असते. तंत्रज्ञानाचा वाढता वेग, बदलती माध्यमे यांच्याशी पटकन जुळवून घेत काम करण्यात आव्हानही आहे आणि आनंदही आहे.

प्रास्ताविक करताना सुनील महाजन यांनी संवाद संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. संजीव शहा यांनी स्वानंद सोशल फेडरेशनचे कार्य प्रेक्षकांसमोर ठेवले. साधना शहा यांनी आशा पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. श्रुती साठे यांनी आभार मानले.

पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पूर्वार्ध आणि उत्तरार्धात आशा भोसले यांनी गायलेल्या हिंदी-मराठी गीतांची सुरेल मैफल आयोजित करण्यात आली होती. जितेंद्र भुरुक, कल्याणी देशपांडे, योगिनी गोडबोले यांनी गीते सादर केली. विवेक परांजपे, मुकेश देडिया, विशाल गंड्रतवार, बबलू सबनानी, विजू मूर्ती साथसंगत केली. अभय गोखले यांनी निवेदन केले. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती सुनील महाजन यांची होती. निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर, साधना शहा, शर्मिला शहा, निवेदिता शहा, श्रुती साठे यांनी संयोजन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×