१४ महिन्यांनंतर पोलीस बंदोबस्तात आला बाहेर
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला तब्बल १४ महिन्यांनंतर प्रथमच कारागृहाबाहेर येण्याची संधी मिळाली आहे. भावाच्या निधनानंतर होणाऱ्या बाराव्या विधीस उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने अटी व शर्तीसह तात्पुरती परवानगी दिली. त्यानंतर चाटे हा पोलीस बंदोबस्तात बीड जिल्हा कारागृहातून बाहेर पडला.
पुण्यात पोपट-मांजराचा वाद थेट ठाण्यात पोहचला सविस्तर बातमी
आरोपी जयराम चाटेच्या भावाचे २ मार्चला निधन झाले होते. त्यानंतर पारंपरिक धार्मिक विधीस उपस्थित राहण्यासाठी चाटेच्या वकिलांनी जिल्हा व विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जावर ६ मार्चला सुनावणी पार पडली. न्यायालयाची अटींसह परवानगी सुनावणीदरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी अर्जाला. विरोध दर्शवला होता. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने मानवीय दृष्टिकोनातून आरोपीला मर्यादित कालावधीसाठी परवानगी दिली.
न्यायालयाने सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे. तसेच पोलीस बंदोबस्ताचा खर्च स्वतः आरोपीनेच भरण्याचे आदेश देण्यात आले असून न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात तांबवा गावी आगमन न्यायालयाच्या आदेशानंतर जयराम चाटे याला कडक पोलीस बंदोबस्तात बीड जिल्हा कारागृहातून बाहेर काढण्यात आले. त्याच्या मूळ तांबवा गावात भावाचा बाराव्या विधीचा कार्यक्रम पार पडत असून या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवला होता.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
प्रशासन सतर्क हे प्रकरण संवेदनशील असल्याने धार्मिक विधीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाला विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिसरात पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, धनंजय देशमुख यांनी आरोपीला दिलेल्या परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. धार्मिक विधीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी केला. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या खटल्याकडे लागले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संभाव्य तणाव लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने पूर्ण जबाबदारी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.






















