मांजराने केलेल्या घाणीमुळे पेटला वाद

मांजराने केलेल्या घाणीमुळे पेटला वाद

हातघाईमुळे भांडण पोहचले पोलीस ठाण्यात

marathinews24.com

पुणे – शहरात पाळीव प्राण्यांमुळे शेजाऱ्यांमध्ये वाद होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. ‘लव्हबर्ड पोपट विरुद्ध मांजर’ वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याची घटना ताजी असतानाच, आता मांजराने दारात केलेल्या घाणीवरून दोन कुटुंबांमध्ये तुफान वाद झाला. त्यानंतर प्रकरण थेट मारहाणीपर्यंत पोहोचले. ही घटना येरवड्यात घडली असून, याप्रकरणी कोमल भास्कर शिरसागर (वय २९ रा. यशवंतनगर, येरवडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुन्नी सलिम शेख आणि सिबा शेख (दोघी रा. यशवंतनगर) यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १८ मार्चला दुपारी दीडच्या सुमारास यशवंतनगर परिसरातील साईबाबा मंदिराजवळ घडली.

एमबीबीएस कॉलेजमध्ये ॲडमिशनची बतावणी; ८ लाखांना फसवले – सविस्तर बातमी 

तक्रारदार आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. १८ मार्चला आरोपींच्या पाळीव मांजराने तक्रारदारांच्या घराच्या दरवाज्यासमोर घाण केल्याचा आरोप केला. याबाबत कोमल शिरसागर यांनी शेजाऱ्यांना जाब विचारत, “तुमच्या मांजराने घाण केली आहे, ती साफ करा,” अशी मागणी केली. मात्र, समोरच्या बाजूने “ते मांजर आमचे नाही,” असे उत्तर देण्यात आले. या वाक्यांपासून सुरू झालेला वाद काही क्षणांतच तापला.

दोन्ही बाजूंनी जोरदार बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली आणि शेवटी हा वाद हातघाईवर आला. आरोपानुसार, मुन्नी शेख आणि सिबा शेख यांनी कोमल शिरसागर यांना हाताने मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर हा ‘दारातल्या घाणीचा’ वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. दोन्ही कुटुंबांना कायद्याच्या दारात जावे लागले. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही पक्षांना समज देत प्रकरणाची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×