अपघातात तिघे जखमी
marathinews24.com
पुणे – भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भूमकर पूल परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तिघे जण जखमी झाले आहेत. अमरजा गोपाळ हांडे (वय ३७, रा. गोकुळनगर, वारजे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार साहिल सुनील कवडे (वय २२, रा. लिपाणे वस्ती, जांभुळवाडी, आंबेगाव) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अमरजा यांची मुलगी अस्मिता (वय १७) हिने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अत्याचार झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अस्मिता, तिची आई अमरजा आणि भाऊ हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन ९ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास निघाले होते. नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ दुचाकीस्वार साहिल कवडे हा भरधाव वेगाने निघाला होता. दुचाकीस्वार कवडे याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीस्वार अस्मिताला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी अमरजा, त्यांचा मुलगा हे जखमी झाले. अमरजा, तसेच दुचाकीस्वार कवडे याला गंभीर दुखापत झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमरजा यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघातात कवडे हा गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीस्वार अस्मिता आणि तिच्या भावाला दुखापत झाली. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी कवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक तूपसौंदर तपास करत आहेत.





















