केअरटेकर महिलेचे हातपाय बांधत केली मारहाण
marathinews24.com
पुणे – महिलांना वेश्या व्यवसायाच्या नरकातून बाहेर काढून सुरक्षित आश्रय देण्याचा दावा करणाऱ्या मोहमंदवाडी ससाणे वस्ती येथील रेस्क्यू फाऊंडेशन मधून १२ बांगलादेशी महिला पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २३ मार्चला पहाटे घडलेला हा प्रकार तब्बल २० दिवस दडपून ठेवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील बँकेची फसवणूक – सविस्तर बातमी
पळून गेलेल्या दोन महिलांना त्याच दिवशी सय्यदनगर परिसरातून पुन्हा ताब्यात घेण्यात आले असले, तरी उर्वरित १० महिला अजूनही फरार आहेत.
सर्व महिला २३ ते ३३ वयोगटातील असून, शहरातील विविध ठिकाणी वेश्या व्यावसायावर केलेल्या कारवाईतून त्यांची सुटका करण्यात आली होती. दिघी पोलीस ठाणे, फरासखाना पोलीस ठाणे, देहूरोड पोलीस ठाणे, जेजुरी पोलीस ठाणे आणि कोंढवा पोलीस ठाणे यांच्या कारवाईतून त्यांना वाचवण्यात आले होते. न्यायालयाने १८ मार्चला या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी दूतावासाशी समन्वय सुरू असतानाच, सुरक्षेचा पूर्ण बोजवारा उडाल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. असा घडला प्रकार दि. २३ मार्चला सकाळी साडेसहा वाजता एका बांगलादेशी महिलेनी पोटदुखीचे नाटक करत महिला केअर टेकरला बोलावले.
औषधाची मागणी केली. यावेळी औषध देण्यासाठी आलेल्या महिलेवरच झडप घालत मैत्रिणीच्या मदतीने तिच्या तोंडात बोळा कोंबला, हात-पाय बांधले आणि त्यानंतर सर्वांनी मिळून मुख्य गेटचे कुलूप उघडून थेट पळ काढला. धक्कादायक बाब म्हणजे, रेस्क्यू फाऊंडेशनकडून वारंवार पोलिस संरक्षणाची मागणी करूनही ती पुरवण्यात आली नसल्याचे बाबही समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचाच नव्हे, तर सरळसरळ यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नुकत्याच ईद सणादरम्यान या महिला केंद्रात व्यवस्थित राहत होत्या. तरीही अचानक असा थरारक पलायनप्रकार घडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केल्याचा दावा केला असला, तरी २० दिवस उलटूनही दहा महिलांचा मागमूस नाही. त्यामुळे बांगलादेशींना पकडण्याचा गाजावाजा करणाऱ्या पोलिसांना धड असून या घटनेने शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाल्याचे अधोरेखीत केले आहे.





















